मुंबईः ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दात निषेध नोंदवला. संजय राऊत हे विधानमंडळाला चोर म्हणत आहे. पण उद्धव ठाकरे हे याच सभागृहाचे सदस्य आहेत. मग आम्ही सर्वच चोर ठरतोय का? असा संतप्त सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित (DCM Devendra Fadnavis on Sanjay Raut`s comment) केला. विधान परिषदेत बोलताना त्यांनी संजय राऊत यांचे वक्तव्य सहन करण्यासारखे नाही, असे निक्षून सांगितले. राऊत यांच्या वक्तव्यावर काय कारवाई होणार, हे जनता देखील पहात असून अध्यक्षांनी त्यांच्या अधिकारातून याबाबत निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले.
संजय राऊतांच्या वक्तव्याचे पडसाद विधान परिषदेतही उमटले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संजय राऊत यांचे वक्तव्य हे सहन करण्यासारखे नाही. अध्यक्षांनी त्यांच्या अधिकारातून निर्णय घ्यावा. आज जर आपण विषय गांभीर्याने घेतला नाही तर असे हजारो राऊत विधीमंडळाच्या विरोधात बोलतील. उद्धव ठाकरेही याच विधीमंडळाचे सदस्य आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासह आम्ही सर्वच चोर ठरतोय? आम्ही गुंड आहोत का, असा संतप्त सवाल फडणवीसांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्रातील विधानमंडळ देशातील सर्वोत्तम विधान मंडळ म्हटले जाते. पण विधान मंडळाला चोर म्हणण्याचा अधिकार दिला तर मग या विधानमंडळावर कुणाचा विश्वास राहणार नाही. तसेच विधान मंडळावर कोणी काही बोलू नये, म्हणून हक्कभंगाची व्यवस्था केली आहे, याकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधले.