ओबीसी हितासाठी काँग्रेसने काय केले, रवींद्र चव्हाण यांचा सवाल

0

नागपूर – स्वातंत्र्यानंतर 70 वर्षात जे देशात झाले नाही ते ओबीसी हिताचे निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतले. ओबीसी वसतिगृह, वैद्यकीय विद्यार्थ्यांना आरक्षण असे अनेक निर्णयांचा यात समावेश आहे. काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याने ओबीसी कल्याणासाठी काँग्रेसने काय केले हे सांगावे असे आव्हान या निमित्ताने ‘शंखनाद’ न्यूज चॅनेलशी बोलताना भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश संपर्कप्रमुख रवींद्र चव्हाण यांनी दिले. याउलट ओबीसी हिताचे 27 जीआर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर सहा जीआर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात निघाले ही गोष्ट स्वतः ओबीसी नेते देखील कबूल करतात.

काँग्रेस सरकारमध्ये ओबीसींवर अन्याय झाला याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले. मराठा आरक्षण सरकारने जरूर द्यावे मात्र ओबीसी हिताकडे दुर्लक्ष होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, सकल मराठा समाजाच्या आंदोलनात कुणबी समाजानेही सक्रिय सहभाग दिला. मराठ्यांच्या लढाईत आम्ही सोबत राहिलो.मात्र, ओबीसीच्या आरक्षणातून कोणालाही वाटेकरी होऊ देणार नाही असे यावेळी चव्हाण यांनी आवर्जून स्पष्ट केले. 2ऑक्टोबरला वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातून निघालेल्या ओबीसी जागर यात्रेचा शुक्रवारी 13 ऑक्टोबर रोजी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे समारोप झाला.

विदर्भातून हजारो लोक या समारोप कार्यक्रमासाठी एकवटले होते. यानिमित्ताने वाशिम येथे ओबीसी जागर यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते, प्रदेश प्रभारी माजी आमदार डॉ आशीष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भव्य अशी रॅली काढण्यात आली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या 90वर्षातील विविध उपलब्धी, ओबीसी कल्याणाच्या योजनांची माहिती सर्वसामान्यांना दिली गेली.