,नागपूर :मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज बुधवारी नागपुरात संघ मुख्यालयी भेट दिली. तासाभराची धावती भेट, सरसंघचालकांशी चर्चेनंतर ते जबलपूरला रवाना झाले. नागपुरात पावणे अकराच्या सुमारास आल्यानंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण महाल संघ मुख्यालयी पोहचले. सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्याशी त्यांनी सुमारे पाऊण तास बंदद्वार चर्चा केली. बाहेर पडल्यानंतर शिवराजसिंह यांनी माध्यमाशी बोलण्यास नकार दिल्याने या दोघांमधील चर्चेचा तपशील कळू शकला नाही. मध्यप्रदेशातील राज्य सरकारच्या दारू संदर्भातील धोरणाविरोधात ज्येष्ठ नेत्या, माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी नाराजी व्यक्त करीत आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे. शिवराजसिंह यांची यात अडचण होत आहे. माजी मुख्यमंत्री उमा भारती यांचे शिवराज यांच्याशी असलेले विळा भोपळ्याचे नाते लक्षात घेता सरसंघचालकांनी यात हस्तक्षेप करावा अशी मागणी यावेळी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. कारण, भविष्यात मध्यप्रदेशात विधानसभा निवडणूक होणार आहे. उमा भारती यांचे असेच आक्रमक धोरण राहिल्यास सरकारची कोंडी होऊ नये यासाठी ही भेट असल्याचे बोलले जाते.