जागतिक पर्यावरण दिन

0

जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी जून महिन्यात साजरा केला जातो. जगभरातील सर्व देश ५ जून रोजी पर्यावरण दिन साजरा करतात. यंदाही पर्यावरणाच्या समस्या व पर्यावरण विषयक भवितव्य यांची जाणीव करून देण्यासाठी भारतासह अनेक देशांमध्ये ५ जून रोजी पर्यावरण दिन साजरा केला जात आहे.

 

 

 

पर्यावरण दिनाची सुरुवात सर्वप्रथम १९७२ मध्ये झाली. ५ जून १९७२ रोजी या दिवसाची पायाभरणी संयुक्त राष्ट्रांनी केली. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे ५ जून १९७४ रोजी पहिला पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.

 

 

जगात प्रदूषण सातत्याने वाढत आहे. या वाढत्या प्रदूषणामुळे निसर्गावरील संकट वाढत आहे. तसेच मानवी जीवनशैली अशी बनलेली आहे जी पर्यावरण पूरक नसून पर्यावरणास घातक ठरणारी आहे.

 

 

प्रदूषण तसेच अन्य पर्यावरणीय समस्यांना आळा घालण्याच्या उद्देशाने पर्यावरण दिन साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे लोकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरुकता निर्माण व्हावी आणि निसर्गाला प्रदूषित होण्यापासून वाचवण्याची प्रेरणा मिळावी, असा उद्देश्य निर्माण झाला.संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला असला तरी, पर्यावरण दिन सर्वप्रथम स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे साजरा करण्यात आला. १९७२ मध्ये स्टॉकहोम येथे पहिली पर्यावरण परिषद आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये ११९ देश सहभागी झाले होते.भारत पर्यावरण संरक्षणाबाबतही गंभीर आहे. यासाठी भारताने पर्यावरण रक्षणासाठी कायदा केला आहे. या अंतर्गत १९ नोव्हेंबर १९८६ रोजी पर्यावरण संरक्षण कायदा लागू करण्यात आला.

 

 

पर्यावरण विज्ञान

 

 

यामध्ये तत्त्व, सिद्धांत व जैविक-अजैविक घटकांमधील आंतरक्रियांचा अभ्यास आपण करत आहोत. पर्यावरण शिक्षणात परिसंस्था- रचना, कार्य, संरक्षण व संवर्धन, जैवविविधता, प्रदूषण, पर्यावरणीय आपत्ती-मानवी व नैसर्गिक, जैवलोकसंख्या, पर्यावरणाचा धारणक्षम निरंतर शाश्वत विकास आणि पर्यावरणीय संस्थांच्या भूमिका व कार्याचा ऊहापोह आपण या अभ्यासात करत आहोत. यामध्ये मृदावरण, जीवावरण, जलावरण व वातावरण या सर्व घटकांचाही समावेश आहे. पर्यावरणाच्या अभियांत्रिकी शाखांमधून पर्यावरणातील विविध तत्त्व, संबोधक आणि सिद्धांतासोबतच विविध पर्यावरणातील घटकांचे विश्लेषण, तत्त्वज्ञानाचे उपयोजन आणि पर्यावरण संरक्षण व संधारणासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, या संदर्भात मार्गदर्शन केले जाते.
जॉर्ज पर्किन व मर्श यांनी त्यांच्या ‘मॅन अँड नेचर’ या पुस्तकात (१९०७) मानव व नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर व त्याचे विपरीत परिणाम यावर चर्चा केली आहे. त्यांचे हे पुस्तक पर्यावरण शिक्षण देणारे पहिले पुस्तक ठरते. १८९९ मध्ये पॅट्रिक गेडेस यांनी ‘द आऊटलूक टॉक’ या नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेचे कार्य ‘पर्यावरण शिक्षण सुधारणा’ असे होते. पर्यावरण शिक्षणातून जाणीव, जागृती करून पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणे यासाठी १९६५ मध्ये पर्यावरण शिक्षण हा विषय शिक्षणशास्त्रात समाविष्ट करण्यात आला, तर १९७० मध्ये पॅरिस येथे भरलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत शालेय शिक्षणात पर्यावरण शिक्षणावर भर देण्यात आला. जून १९७२ मध्ये स्टॉकहोम येथे भरलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण परिषदेत जागतिक पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी मानवाचीच असल्याचे म्हटले आहे आणि त्यानुसार आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अमलात आणला व त्याची उद्दिष्टे ऑक्टोबर १९७५ मध्ये बेलग्रेड येथील कृतिसत्रात ठरविण्यात आली.

पर्यावरण शिक्षण

यात पर्यावरणाविषयी ज्ञान, आकलन, कौशल्य, जागृती आणि प्रत्यक्ष अनुभव घेऊन प्रत्येकाने आपली सकारात्मक मनोभूमिका निर्माण करते. तसेच पर्यावरण शिक्षण ही एक सातत्यपूर्ण जीवनभर चालणारी प्रक्रिया आणि हे शिक्षण सर्व शालेय स्तरावर औपचारिक व अनौपचारिक स्वरूपात असेल; जेणेकरून पर्यावरणविषयक एकसंध आणि संतुलित दृष्टिकोन प्रत्येक मानवामध्ये निर्माण होईल. आपल्या देशात पर्यावरणाची गुणवत्ता विकसित करणे, जनतेमध्ये पर्यावरण संरक्षणाची व संधारणाची ऊर्मी निर्माण करणे आणि निर्णय घेण्याची पात्रता विकसित करणे ही पर्यावरण शिक्षणाचे मुख्य ध्येये ठरविण्यात आली.

 

पर्यावरण शिक्षण सद्य स्वरूप

बिलिसी (Tbilisi) येथे भरलेल्या पर्यावरणविषयक परिषदेत पर्यावरण शिक्षणाची खालील तत्त्वे निश्चित करण्यात आली-
१)    पर्यावरणीय शिक्षणात सामाजिक तंत्रज्ञानाविषयक आणि नैसर्गिक पर्यावरणाचा एकत्रितपणे विचार व्हावा.
२)    पर्यावरण शिक्षण ही एक जीवनभर चालणारी शिक्षणप्रणाली असावी, ज्यात शाळापूर्ण शिक्षण, औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण यांचा समावेश असावा.
३)    अध्ययनकर्त्यांला पर्यावरणाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी नियोजन व अंमलबजावणी करण्याची संधी द्यावी.
४)    पर्यावरण शिक्षणाचा उपागम (Approach) आंतर विद्याशास्त्रीय असावा. त्यातून विद्यार्थ्यांचा पर्यावरणविषयक एकसंध व संतुलित दृष्टिकोन निर्माण व्हावा.
५)    वास्तव जीवनाशी निगडित समस्या याच पर्यावरण शिक्षणाच्या केंद्रस्थानी असाव्यात.
६)    पर्यावरणविषयक सकारात्मक दृष्टिकोन व मूल्यनिर्मिती करणे ही या शिक्षणाची महत्त्वपूर्ण उद्दिष्टे असावीत.
७)    प्रमुख पर्यावरणीय प्रश्नाची उकल स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सहकार्यातून करावी.
आज पर्यावरण शिक्षणातील जागरूकता, ज्ञान, दृष्टिकोन, कौशल्य आणि सहभाग ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार (१८ डिसेंबर २००३) पर्यावरण शिक्षणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सदर आराखडय़ात प्रत्येक शालेय स्तरावर पर्यावरण शिक्षणाची उद्दिष्टे व पाठय़क्रम ठरविण्यात आले आहेत.

 

पर्यावरण दिनाचं महत्त्व (World Environment Day Significance )

पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्राधान्याने पावले उचलण्याची गरज आहे. गेली दोन वर्षे महामारीकाळात स्वच्छ, सुरक्षित आणि शाश्वत पर्यावरणाचं महत्त्व कधी नव्हे इतकं लक्षात आलं आहे. जागतिक तापमानवाढ हा मानवजातीसमोरील सर्वाधिक मोठा धोका आहे. भारताने यासंदर्भात पावले उचलण्यास सुरूवात देखील केली आहे. पर्यावरणात प्रदूषित घटकांची वाढ होत आहे, जे आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. म्हणूनच ज्या पृथ्वीशिवाय आणि पर्यावरणाशिवाय आपण जगू शकत नाही ते पर्यावरण निकोप राहण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत, याबाबतची जागृती या दिवसाच्या निमित्ताने केली जाते.