
227 houses collapsed in Gadchiroli, crops on 8 thousand hectares were destroyed गडचिरोली (Gadchiroli), 24 जुलै, गडचिरोली जिल्ह्यात जूनमध्ये दडी मारणाऱ्या पावसाने जुलैमध्ये कसर भरुन काढली. चार दिवसांत अतिवृष्टीमुळे १९ ते २१ जुलै या दरम्यान जिल्ह्यात सुमारे ८ हजार हेक्टरवरील पिके मातीमोल झाली तर तब्बल २२७ घरे कोसळली. दरम्यान, दोघांचा बळी गेला. या हंगामात आतापर्यंत नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या पाच झाली आहे.
जिल्ह्यात १८ जुलैपासून पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर तीन दिवस कायम होता. १८ ते २१ जुलै दरम्यान झालेल्या नुकसानीची माहिती समोर आली आहे. यात १७ मोठी जनावरे, ५ लहान जनावरे मृत्युमुखी पडली. २२७ घरांचे नुकसान झाले असून यापैकी ७ घरे पूर्णतः क्षतिग्रस्त झाली आहेत. सोबतच ३२ गोठ्यांचेही नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील बाराही तालुक्यांत अतिवृष्टीचा तडाखा बसला असून सुमारे ८ हजार २७७ हेक्टवरील ९ हजार ७८० शेतकऱ्यांचे नुकसान झाले. धान, कापूस, सोयाबीन, तूर व भाजीपाला तसेच काही ठिकाणी फळपिकांनाही जबर फटका बसला.
सरासरीपेक्षा २६८ मि.मी. अधिक पाऊस
जून महिन्यात पावसाची सर्वांना प्रतीक्षा होती. मात्र, वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला होता. जुलै जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ही तूट तर भरुन निघालीच, पण सरासरीपेक्षा २६८ मि.मी. अधिक पावसाची नोंद झाली. २१ जुलैपर्यंत वार्षिक सरासरी ३१८.५ मि.मी. इतकी आहे. प्रत्यक्षात ५८५.५ मि.मी. इतका पाऊस झाला.