

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत एआयडीद्वारे निवेदन सादर
नागपूर(Nagpur), २८ मे :
विदर्भाच्या आंतरराष्ट्रीय हवाई संपर्काला चालना देण्यासाठी नागपूरहून दक्षिण-पूर्व आशियासाठी थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याच्या मागणीला नव्याने बळ मिळाले आहे. यासंदर्भात गुरुवारी सेंटर पॉइंट हॉटेल येथे केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एआयडी) तर्फे केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मा. मुरलीधर मोहोळ यांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी एआयडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कपिल चांद्रायन यांनी मा. मुरलीधर मोहोळ यांना सांगितले की, नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे रनवे रिकार्पेटिंगचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर विमानतळ आता २४ तास पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. त्यामुळे नागपूरला दक्षिण-पूर्व आशियाशी जोडणाऱ्या थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठी ही योग्य वेळ आहे, असे नमूद केले.
या निवेदनाद्वारे, उपरोक्त मागणीसाठी एआयडीने सातत्याने पाठपुरावा केल्याचे नमूद करण्यात आले असून, नागपूर आणि विदर्भातील वेगाने वाढणारे औद्योगिक व आयटी क्षेत्र, वाढती परदेशी गुंतवणूक आणि जागतिक संपर्काची वाढती गरज लक्षात घेता या विमानसेवा अत्यंत आवश्यक असल्याचे अधोरेखित केले आहे. टीसीएस, पर्सिस्टंट, ग्लोबल लॉजिक, एचसीएल, टेक महिंद्रा, इन्फोसिस आणि अॅक्सेन्चर यांसारख्या अग्रगण्य कंपन्यांची नागपुरातील उपस्थिती तसेच, विदर्भात होत असलेली मोठ्या प्रमाणावरील गुंतवणूक यामुळे आंतरराष्ट्रीय हवाई संपर्काचे महत्त्व अधिक वाढले आहे.
या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत मा. नितीन गडकरी यांनी मा. मुरलीधर मोहोळ यांना या प्रस्तावासंदर्भात स्वतंत्र बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत मा. मुरलीधर मोहोळ यांनी दिल्ली येथे संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करून या मागणीवर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

















