पुन्हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार

0

हरभरा खरेदी बंद : अजुनही १७ हजारांवर शेतकऱ्यांकडे चना पडून

अकोला (Akola). शेतकऱ्यांचा वाढता रोष (Farmers anger) लक्षात घेता सरकारने उशिरा का होई ना हरभरा खरेदीची प्रक्रिया सुरू केली. शेतकऱ्यांनी भर उन्हात रांगा लावून हरभरा विक्रीसाठी नोंदणी करून घेतली. नाफेडमार्फत (Nafed) हमीभावावर हरभरा खरेदीची उद्दिष्टपूर्ती झाल्याचे कारण पुढे करीत खरेदी बंद करण्यात आली आहे. पण, अजुनही नोंदणी करणाऱे १७ हजारांहून अधिक शेतकऱ्यांकडील हरभरा तसाच पडून राहिली आहे. नाफेडचे अकोला जिल्ह्यातील (Akola district ) उद्दिष्ट वाढवून नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून संपूर्ण हरभरा खरेदी करण्यात यावी, अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व केंद्र सरकारला पाठवलेल्या पत्रात केली आहे. दुसरीकडे हरभऱ्याची खरेदी बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीचा रोष दिसून येत आहे.

 

जिल्ह्यामध्ये आठ संस्थामार्फत हरभरा खरेदीसाठी ३८ हजार ३२९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्यापैकी २० हजार ५४७ शेतकऱ्यांना संदेश पाठवण्यात आले. उर्वरित १७ हजार १९४ शेतकऱ्यांना अद्यापही संदेश पाठवणे बाकी आहे. महामंडळाकडे जिल्ह्यातील पीक पेऱ्यानुसार व कृषी विभागाच्या उत्पादकतेनुसार चार लाख १२ हजार ९०२ क्विंटल उद्दिष्ट प्राप्त झाले होते. खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने हरभरा खरेदी बंद करण्यात आली. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची खरेदी होणे बाकी आहे. हमीदरापेक्षा बाजारपेठेमध्ये फारच कमी दर मिळतो आहे. यामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर अशा अडचणीत शेतकरी सापडला आहे. हमीभावाने खरेदी बंद झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. हरभरा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. नाफेडमार्फत हरभरा खरेदीची अंतिम मुदत ११ जूनपर्यंत आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यासाठी वाढीव उद्दिष्ट देऊन नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांकडील हरभरा हमीभावाने खरेदी करण्यात यावा. सरकारने हे सकारात्मक पाऊल उचलल्यास हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकेल. जिल्ह्याला हरभरा खरेदीचे वाढीव उद्दिष्ट देण्यासाठी संबंधितांना शासनाने आदेश द्यावेत, अशी मागणाी आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पणन विभागाचे अपर सचिवांकडे केली आहे.