आंदोलनाला गालबोट नको, जरांगे याचे आवाहन

0

(Jalna)जालना : उपोषणावर कायम असलेले मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी आंदोलनकर्त्यांना शिस्त बाळगण्याचे आवाहन केले आहे. मराठा आंदोलनाला गालबोट लागेल, असे कृत्य कुणीही करू नये. आम्ही मराठा समाजातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमचे जीवन पणाला लावले आहे. त्यामुळे कुणीही आत्महत्येसारखे पाऊल उचलू नये, असे आवाहन मनोज जरांगे यांनी शुक्रवारी प्रसार माध्यमांशी बोलताना केले. आत्महत्या, जाळपोळ, दगडफेक अशा कृत्यांपासून दूर राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी गाड्यांची जाळपोळ केल्याचे प्रकार घडले. त्यामुळे मराठा समाजाच्या या आंदोलनाला गालबोट लागण्याची भीती वर्तविली जात आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्यातील सर्व मराठा बांधवांना कळकळीचे आवाहन केले आहे. या आंदोलनाला सर्व मराठा समाजाने पाठिंबा दिला आहे. वाढता पाठिंबा पाहता, आपल्याला यश येण्याची शक्यता जास्त आहे. मराठा समाजाने आंदोलने करावे, पाठिंबा वाढवावा मात्र, आंदोलनाला गालबोट लागेल, असे काहीही करू नये, असे आवाहन आपण करीत असल्याचे त्यांनी सांगितले. तरुणांनी आत्महत्या केली तर आम्ही आरक्षण कोणासाठी मागतोय? असा प्रश्न निर्माण होईल. कोणीही उग्र आंदोलन करू नये, असे आवाहन देखील (Jarange) जरांगे यांनी केले आहे.