विवरण पत्रात दाखवली २९.३८ कोटींची मालमत्ता
अमरावती. विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी (Amravati Division Graduate Constituency Election) दोन टर्म आमदार राहिलेले भाजपचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील (Ranjit Patil) यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न ७७.६४ लाख रुपये आणि पत्नी डॉ. अपर्णा यांचे १.७३ कोटी रुपये आहे. त्यांच्याकडे जंगम आणि स्थावर मालमत्तांसह एकूण २९.३८ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. रणजीत पाटील हे गेल्या बारा वर्षांपासून अमरावती (Amravati) विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्रीपदसुद्धा (Minister of State) सुद्धा भूषवले आहे, येत्या ३० जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत त्यांनी आपले संपत्तीच विवरण दिले आहे. त्यातून ही माहिती पुढे आली आहे.
रणजीत पाटील यांनी ३१ मार्च रोजी पूर्ण झालेल्या गेल्या पाच आर्थिक वर्षांसाठी आयकर रिटर्नमध्ये दर्शविलेले एकूण उत्पन्न पुढीलप्रमाणे आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात ३८,४०,९००, २०१८-१९ मध्ये ३३,७१,५९०, २०१९-२० मध्ये ३४,५१,३३०, २०२०-२१मध्ये ५१,२३,३८० आणि २०२१-२२ मध्ये ७७,६३,७०० रुपये उत्पन्न दाखविले आहे. डॉ. रणजीत पाटील यांच्या पत्नी डॉ. अपर्णा पाटील यांच्या गेल्या पाच आर्थिक वर्षांसाठी आयकर रिटर्नमध्ये दर्शविलेले एकूण उत्पन्न २०१७-१८ मध्ये ६,९४,१७०, २०१८-१९मध्ये १७,७४,४५०, २०१९-२०मध्ये १२,३२,३२०, २०२०-२१मध्ये ९,९७,०९० आणि २०२१-२२मध्ये १,७२,९४,२६० रुपये उप्तन्न दाखविण्यात आलेले आहे.
रणजीत पाटील यांचा मुलगा शर्व याचे २०१७-१८चे वार्षिक उत्पन्न २,५२,५२०, २०१८-१९मध्ये २,६८,११०, २०१९-२०मध्ये २,८४,८६०, २०२१-२२ मध्ये ८७,४१० आणि २०२१-२२ मध्ये ६,७९,४०० येवढे उत्पन्न दाखविण्यात आलेले आहे.
डॉ. रणजीत पाटील यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात एकही गुन्हा दाखल नाही. न्यायालयात कुठलेही प्रकरण नाही. स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार म्हणून त्यांची छवी राहिलेली आहे. ३० जानेवारी रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत त्यांची थेट लढत होणार असल्याची स्थिती सध्या तरी आहे.
प्रहार जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी मेस्मा संघटनेसोबत मिळून या निवडणुकीत उमेदवार उभा केला आहे. ते या निवडणुकीवर किती प्रभाव टाकतात, यावर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. सोमवारी १६ जानेवारीला किती जण माघार घेतात, यानंतर खरी लढत कशी होईल, हे स्पष्ट होणार आहे.