नाशिक : काँग्रेसमधून निलंबन झालेले युवा नेते सत्यजीत तांबे यांनी अखेर आपल्या निलंबनावर मौन सोडले आहे. काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा आपण कधीच विचार केला नाही, असे ते म्हणाले. आपल्या निलंबनाचे दुःख असून योग्यवेळी त्यावर उत्तर देईल, असे तांबे म्हणाले. तांबे म्हणाले की, “अगदी जन्मापासून मला फक्त काँग्रेसच माहिती आहे. माझ्या रक्तात काँग्रेस आहे. माझ्या श्वासात देखील काँग्रेस आहे. आम्ही काँग्रेस सोडून कधी दुसरा विचार केला नाही. एकनिष्ठ राहून पक्षाचे काम केले आहे”, असे ते म्हणाले. २०३० साली माझ्या परिवाराला काँग्रेसमध्ये १०० वर्ष पूर्ण होणार आहेत. “माझ्या पणजोबा-आजोबांपासून आम्ही सतत चार चार पिढ्या काँग्रेसमध्ये काम करीत आहोत”, याचा उल्लेखही तांबे यांनी एका वाहिनीशी बोलताना केला.
सत्यजीत म्हणाले की सत्तेची पदे आमच्यासाठी फार महत्त्वाची नाहीत. जन्माला आल्यापासून आम्ही सत्ता पाहत आलो आहोत. सत्ता हा आमच्यासाठी फार महत्त्वाचा मुद्दा नाही. राजकारणात आपण काय काम करण्यासाठी आलो आहोत, ते माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले. आपल्याला पाठिंबा देण्यासाठी शिक्षकांच्या संघटना, कर्मचारी संघटना, पदाधिकारी उत्सूक असून योग्यवेळी आपण त्यावर निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या बाबतीत राजकारण सुरु असून राजकारण होऊ द्या, मगच मी त्यावर बोलणार असल्याचे सत्यजीत म्हणाले.
निलंबनाची कारवाई
नाशिक पदवीधर मतदारसंघात पक्षाच्या विरोधात (Nashik Graduate Constituency) बंडखोरी करणारे सत्यजीत तांबे यांच्यावर काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली आहे.( Satyajeet Tambe Suspended from Congress) काँग्रेसने त्यांचे वडील सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी दिली असताना सत्यजीत तांबे यांनी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून त्यांना भाजपकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, काँग्रेसने महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या मतदारसंघात सत्यजीत तांबे विरुद्ध शुभांगी पाटील असा मुकाबला रंगणार आहे.