नागपूर: कर्मचाऱ्यांना जे सामाजिक संरक्षण हवे आहे, त्यांना निवृत्तीनंतर जे फायदे हवे आहेत, त्यासंदर्भात जे तत्व आहे, ते आम्ही मान्य केले आहे. याची कार्यवाही कशी करायची, यासाठी एक समिती काम करत आहे. सरकारने कुठेही आडमुठी भूमिका न घेतल्याने कर्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतला. त्यासाठी मी कर्मचाऱ्यांचं मनापासून आभार मानतो. पुन्हा एकदा सरकारच्या वतीने सांगू इच्छितो की, सगळे कर्मचारी आमचेच आहेत. त्यांना जे चांगल्यात चांगलं देता येईल, ते देण्याचा प्रयत्न करणं ही आमची जबाबदारी आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात बोलताना व्यक्त केली.
राज्य कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात प्रतिक्रिया दिली. फडणवीसांनी कर्मचाऱ्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाबद्दल विचारले असता फडणवीस म्हणाले की,“ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. कर्मचाऱ्यांचा जो प्रश्न होता, तो आम्ही समजून घेतला आहे. यामध्ये आम्ही कुठेही अहंकार न ठेवता त्यांच्याशी संवाद साधला. ही समिती तीन-चार ठरलेल्या मुद्द्यांवर अहवाल सादर करेल. त्या अहवालाच्या आधारावर आम्हाला पुढची कारवाई करता येईल. संवादातून तोडगा निघतो, असं आम्ही सातत्याने म्हणत होतो. आता संवाद झाला आहे. त्यामुळे मी कर्मचाऱ्यांचे स्वागत करतो. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानतो, असे फडणवीस म्हणाले.