साहित्य संमेलनात गझल कटट्याचे थाटात उद्घाटन
वर्धा :गझल या कविता प्रकारावर उर्दू भाषेचा पगडा असला तरी मराठी गझलने आपले वेगळेपण जपले आहे. अनेक मराठी गझलकार मागील काही काळात नावारुपाला आले असून या प्रांतात उत्तम कार्य करीत आहे. मराठी गझलेला चांगले दिवस यायचे असतील तिने सर्वसमावेश भाव स्वीकारावा, असे प्रतिपादन सल्लागार साहित्य संमेलन समिती डॉ. गिरीश गांधी यांनी केले.
96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी कविवर्य सुरेश भट गझल कट्ट्याचे उद्घाटन वनराईचे डॉ. गिरीश गांधी यांच्या हस्ते पार पडले. गझल कट्ट्यासाठी एकुण 538 गझल आल्या होत्या. त्यापैकी 240 गझलची निवड करण्यात आली. या सत्राच्या अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व गझलकार आशा पांडे होत्या. मंचावर अ. भा. मराठी साहित्य महामंडळ सदस्य दगडू दादा लोमटे व गजानन नारे, विदर्भ साहित्य संघ वर्धा शाखेचे संजय इंगळे, राज्य माहिती आयुक्त राहूल पांडे व समन्वयक नितीन देशमुख यांची उपस्थिती होती.
विनायक लळित, रमेश सरकाटे, जयप्रकाश सोनूरकर, गुलाब मेश्राम, अरविंद उन्हाळे, उज्वला इंगळे, जयंत कुलकर्णी, प्रशांत भंडारे, अरुण विघ्ने या गझलकारांना प्रामुख्याने कार्यक्रमात सहभाग होता.
आशा पांडे यांनी मराठी गझलांचे सम्राट सुरेश भट यांच्या तसेच, विदर्भातल्या गझलकारांच्या योगदानावर प्रकाश टाकला. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक संजय इंगळे तिगावकर यांनी केले.