नागपूर -(NAGPUR) नागपूर जिल्ह्यातील सात बाजार समित्यापैकी तीन बाजार समितीसाठी काल झालेल्या मतदानाचे निकाल आज जाहीर झाले. रामटेकमध्ये काँग्रेसचे आमदार सुनील केदार, शिंदे गटाचे आमदार(Ashish Jaiswal) आशिष जैस्वाल यांची युती मतदारांनी झुगारली. या ठिकाणी केदार यांचेच कार्यकर्ते असलेल्या काँग्रेसचे सचिन किरपान यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलच्या 18 पैकी 14 जागा निवडून आल्या. 4 जागा (BJP)भाजपचे माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी आणि (CONGRESS)काँग्रेसच्याच गज्जू यादव यांच्या आघाडीला मिळाल्या. मांढळमध्ये काँग्रेसला 17 तर 1 अपक्ष असा परंपरागत काँग्रेसला कौल मिळाल्याने जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, आमदार राजू पारवे यांनी भाजपचे माजी आमदार सुधीर पारवे यांना मात दिली आहे. पारशिवणीत काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी पुन्हा आपले वर्चस्व कायम राखले आहे. या ठिकाणी सर्व 18 जागा केदार गटाने काबीज केल्या आहेत. सावनेर बाजार समितीमध्ये काँग्रेसचे आमदार सुनील केदार गटाने विरोधकांना धूळ चारुन, सर्व १८ जागा यापूर्वीच जिंकल्या. विरोधकांनी सुनील केदार यांच्या गटाविरोधात उमेदवारच न दिल्यामुळे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले हे विशेष. दरम्यान,रामटेक, कुही-मांढळ आणि पारशिवनी बाजार समितीसाठी गुरुवारी मतदान झाले. रामटेक बाजार समितीमध्ये केदार गटाविरोधात चार पक्षांनी मोर्चेबांधणी केली होती. हा निकाल शिंदे गटाला धक्का आहे. याठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून आमदार सुनील केदार यांचे वर्चस्व आहे. यावेळी मात्र, त्यांचे खंदे समर्थक त्यांच्याच विरोधात गेल्याने शेवटी आशीष जयस्वाल यांच्या गटासोबत त्यांना युती करावी लागली.