
रायपूर (Raipur) :- छत्तीसगडच्या गरियाबंदमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत आतापर्यंत १५ नक्षलवादी ठार झाले आहेत. ही चकमक अजूनही सुरू असून ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या आणखी वाढू शकते. यापूर्वी सुरक्षा दलांनी बिजापूरमध्ये १८ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. सर्व मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
यासंदर्भातील माहितीनुसार गरियाबंद जिल्ह्यातील कुल्हाडी घाटावर असलेल्या भालू डिग्गी जंगलात सुरक्षादलाच्या सुमारे १००० जवानांनी नक्षलवाद्यांना चारही बाजूंनी घेरले आहे. याठिकाणी रविवार सकाळपासून अधूनमधून गोळीबार सुरू आहे. मैनपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या या चकमकीत सीआरपीएफच्या कोब्रा युनिटचा एक जवानही जखमी झाला आहे. त्याला विमानाने रायपूरला नेण्यात येत आहे. यापूर्वी रविवारी झालेल्या चकमकीत २ नक्षलवादी ठार झाले होते आणि एक सैनिकही जखमी झाला होता. गरियाबंद येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत नक्षलवादी जयराम उर्फ चालपती ठार झाला आहे. तो नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य होता आणि त्याच्यावर १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. आतापर्यंत १४ हून अधिक नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत.
ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये वरिष्ठ माओवादी कार्यकर्त्यांचा समावेश आहे, ज्यांची ओळख पटवली जात आहे. चकमकीत एसएलआर रायफल्ससारखी स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. नक्षलविरोधी शोध मोहिमेत, गरियाबंद ऑपरेशन ग्रुप ई-३०, कोब्रा २०७, सीआरपीएफ ६५ आणि २११ बटालियन, एसओजी- नुआपाडा यांचे संयुक्त पथक मोहिम राबवत आहे.
या चकमकीत अनेक वॉन्टेड नक्षलवादी ठार झाल्याचा दावा सुरक्षा दलांनी केला आहे. छत्तीसगड आणि ओडिशाच्या जवानांनी राबवलेल्या या संयुक्त कारवाईत एकूण १० पथके सहभागी होती. या चकमकीत ओडिशातील ३, छत्तीसगड पोलिसांच्या २ आणि सीआरपीएफच्या ५ पथकांचा समावेश आहे. चकमकीची माहिती मिळताच, दलाचे वरिष्ठ अधिकारी मैनपूरला पोहोचले आहेत. संपूर्ण परिसरात सैन्य तैनात करण्यात आले आहे. याशिवाय तीन ओळखपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.