कांद्याचा प्रश्न पेटला, विधानसभेत गोंधळ, खरेदी सुरु झाल्याची सरकारची ग्वाही

0

     मुंबई : राज्यभरात कांद्याचे दर गडगडल्याने कांदा उत्पादक संकटात असून त्याचे पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले (Maharashtra Assembly Budget Session) आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. कांद्याची निर्यात वाढवण्याची मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आली आहे तर दुसरीकडे सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून कांदा खरेदी सुरु झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत दिली. मात्र, विरोधकांकडून गोंधळ सुरुच राहिल्याने अखेर उपमुख्यमंत्री फडणवीस त्यांच्या मदतीला धावून आल्याचे चित्र विधानसभेत दिसले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादीच्या आमदारांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून पायऱ्यांवर उतरत आंदोलन केले. कांद्याला हमीभाव मिळावा, यासाठी शेतकऱ्यांसह आता आमदार कांदा प्रश्नी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. विधानभवनाच्या कामकाजाची सुरूवातही कांद्याच्या प्रश्नावरून झाली. छगन भुजबळ यांनी हा मुद्दा उपस्थित केला. कांद्याच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मुद्यावर बोलत असताना देखील गोंधळ सुरुच राहिला. भूजबळांच्या मुद्द्याला उत्तर देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करु, असे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र बोलत असतांना विरोधकांनी एकच गोंधळ सुरु केला. मुख्यमंत्र्यांना विरोधी आमदार बोलू देत नव्हते. शेवटी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उठले आणि त्यांना सर्वांना ऐकून घेण्याचे आवाहन केले. शेतक-यांच्या प्रश्नांवर आपल्याला मार्ग काढायचा आहे की राजकारण करायचे आहे, हे ठरवा असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृह शांत केले. दरम्यान, नाफेडने खरेदी सुरु केली आहे. ज्या ठिकाणी खरेदी सुरु केली नसेल त्या ठिकाणी देखील खरेदी सुरु करण्यात येणार आहे. तसेच निर्यातीवर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.