ओळख पटली ज्यास स्वतःची

0

वेध १….

भारतीय भावजीवनात खोलवर रुजलेले दैवत, श्री हनुमंत ! सप्त चिरंजीवांपैकी एक असलेल्या श्री हनुमंताचे संपूर्ण जीवनच व्यक्तिमत्व विकासाची पाठशाला ! अंगीकृत कार्याशी सर्वार्थाने तादात्म्य पावलेले विभूतीमत्व !
तो बुद्धीमताम् वरिष्ठम् आहे .तुलसीदास त्याला ज्ञानगुणसागर म्हणतात,तर समर्थ रामदास भीमरूपी महारुद्रा .तुमच्या माझ्या भोवतालच्या भोगासक्त वर्तमानात हनुमंतस्मरण आवश्यक ठरतं ते त्याच्या जीवनातून मिळणाऱ्या अतुलनीय समर्पणशीलता आणि दास्यभक्तीच्या शिकवणीसाठी .त्याच्या आयुष्याच्या संपूर्ण पटाचे अधिष्ठानच ‘राम काज करिबे को आतुर’ हे आहे.त्याशिवाय त्याला काहीही नकोय.रामकथा त्याचे शिवाय पूर्ण होऊ शकत नाही.तो या कथेचा कीलक आहे.तो आदर्श सखा आहे,सर्वोत्कृष्ट मंत्री आहे,तो सदैव साधक आहे,समर्पित,तत्पर,कार्यकर्ता आहे.राज्याभिषेकानंतर राम सगळ्यांना काहीना काही देत आहेत.हनुमंताने काय मागावे ? त्याला काहीही नकोय.मिळालेल्या रत्नमालेतील मोतीही त्यात ‘राम’ नाही म्हणून तो टाकून देतोय.रामाप्रती असणाऱ्या त्याच्या उत्कट समर्पणाचा हा ‘हनुमत’बोध नेमक्या शब्दातून सांगताना स्वामी विद्यानंद लिहितात,

त्यास न भावे सोने,वैभव,
जाऊन बसला झाडावरती,
एकेक मणि तोडुन फेकी,
राम स्वये ते दृश्य पाहती,
लक्ष्मण हे ते दृश्य पाहता,
विचारी मरुता काय असे हे,
जिथे न असतो राम,
अम्हां ते दगडी कांचन,
काय तयाचे मूल्य,असे हे ।

रामकार्यासाठी म्हणजेच भव्यदिव्य समाजहितासाठी संपूर्ण समर्पणाच्या भावनेने झोकून दिले तर अशक्यप्राय गोष्टही साध्य होऊ शकते याचा वस्तुपाठ हनुमान चरित्र देतं.समुद्र उल्लंघनासारखी अचाट कामगिरी हनुमंत बजावू शकला ते केवळ त्याच्या अतुलनीय सामर्थ्य बळावर.पण या अपरिमित पराक्रमाचे गंतव्य स्वतःसाठी भोगविलासाची लंका प्राप्त करणे हे नव्हते.तुलसीदास म्हणतात,
प्रभु मुद्रिका मेलि मुख माही
जलधी लांघ गये अचरज नाही..
प्रभू मुद्रिका म्हणजे देवभक्तीचे अधिष्ठान.विशुद्ध समाजहितासाठी प्रभु मुद्रिका घेऊन जो निघतो त्याला त्याचं गंतव्य प्राप्त होतच.कोणत्याच अडचणींची बाधा त्याला रोखू शकत नाही.
या समाजकार्यासाठी निघाल्यावर सर्वप्रथम आडवी येते ती सुरसा राक्षसाची भयभीत करणारी संकट माला ! त्यावर हनुमंत अतिशय धैर्याने आणि बुद्धिचातुर्याने मात करतात. पुढचा सामना पाण्यात खाली खेचणाऱ्या सिंहली राक्षसीशी.कौटुंबिक सुखोपभोगाचा बरमुडा ट्रँगल,मायेच्या बंधनाची छाया कोणत्याही समाज कार्यकर्त्याला अशीच स्वतःकडे खेचून त्याचे खच्चीकरणं करत असते.हनुमंत त्यावरही लीलया मात करतात.सर्वात शेवटी त्याला अडवतो, सर्व भोगविलासांनी समृद्ध,संतृप्त मैनाक पर्वत ! अंगीकृत कार्याच्या वाटेवरील अपरिहार्य पणे येणारे मोहाचे क्षण जिंकणं अतिशय कठीण असतं.कार्यकर्त्यांची,कर्तृत्ववान माणसांची ही सर्वात मोठी सत्वपरीक्षा असते.भली भली माणसे सुद्धा कांचन,कामिनी आणि कीर्तीच्या या मैनाक पर्वतावर अडकून बसतात.हनुमंत समाजकार्यात बाधा निर्माण करणाऱ्या या सर्व संकटांवर आणि मोहांवर निग्रहाने मात करून सीता शोध घेतो आहे.

रामायणात हनुमंत लीलांचे अनुपमेय वर्णन आहे.सगळ्यात मनाला भिडणारा प्रसंग किष्किंधाकांडातला.सीता शोध घेत सारे दक्षिण टोकावर पोहोचले आहेत. समोर अथांग समुद्र. संपातिने सांगितलंय या अपार सागरा पलीकडे लंका आहे आणि तिथल्या राजाने,रावणाने सीतेला पळवून नेल्याचे मी पाहिले आहे.विचारविनियम सुरू होतोय.लंकेत जाऊन सीतेचा शोध घ्यायचा तो कसा आणि कोणी? शंभर योजनांचा समुद्र कोण ओलांडणार ?
अनेक वानर प्रयत्न करून बघतात.पण सारेच प्रयत्न व्यर्थ ठरतात.निराश मनाने परत निघालेल्या साऱ्यांना जांबवंत सांगतात,’आपल्यापैकी कोणीही हे अचाट कार्य करू शकणार नाही. फक्त आणि फक्त हनुमानाच हे उड्डाण करू शकतो.’ वानर हनुमंताकडे येतात. स्वतःची ओळख विसरलेला हनुमान हा प्रस्ताव धुडकावून लावतो.’वानर कुळात जन्मलेल्या माझ्यासारख्या पामराला हे दुष्कर काम कसे जमणार ? त्याच्या या प्रश्नावर जांबुवंताने हनुमंताला पटवून दिलेली त्याची ओळख हे जगातले सर्वोत्तम मोटिवेशनल लेक्चर आहे. जगातल्या कोणत्याही जाती-धर्म- प्रांत-देशातील हतवीर्य झालेल्या मनामध्ये जगण्याची आणि जिंकण्याची आकांक्षा निर्माण करण्याची ताकद त्या प्रतिपादनात आहे. जांबुवंत त्याला जागवित आहेत. अगदी छोटा असताना सूर्यबिंब गिळणाऱ्या तुला,प्रत्यक्ष वायुपुत्राला हे कार्य काय कठीण ?’ प्रत्यक्ष तेजोनिधि लोह गोल अशा सहस्त्ररश्मी सूर्यावर अगदी शिशु अवस्थेत हनुमंताने घेतलेली झेप आणि त्यामुळे तिन्ही लोकात माजलेला हाहाकार,हनुमंताला विस्मरणाचा मिळालेला शाप.. या साऱ्या घटनाक्रमाचे जांबवान रोचक पणे हनुमंताला स्मरण करून देतात.या साऱ्या विवेचनातून हनुमंताला स्वतःची ओळख पटत जाते.आत्म विस्मृतीचे सारे मळभ गळून आत्मप्रचितीच्या सुवर्ण शलाकांनी त्याचे मनाकाश उजळून निघते आणि मग हृदयामध्ये राम कार्याची ज्वाला तेवत ठेवून, दुर्दम्य आत्मविश्वासाच्या पंखांनी तो ऐतिहासिक उड्डाण घेतो.
आयुष्यात ही स्वतःची ओळख पटण हेच आत्यंतिक महत्त्वाचं.ती पटली की तुमच्या माझ्या अंतकरणातला हनुमंतही आकाशाला गवसणी घालायला सिद्ध होतो.ही ओळख पटली की देवाचा वेगळा शोध घेत फिरावे लागत नाही..असे जीवनादर्श,नागपूरचे जुन्या पिढीतील कविवर्य बोबडे यांच्या शब्दात आपल्याला सदैव सांगत असतात,

सागर पोहत बाहुबलाने,नाव तयास मिळो न मिळो रे
स्वयेच जो तेजोनिधीतरणी तद्गृही दीप जळो न जळो रे
जो करी कर्म अहेतुक निरंतर,वेद तयास कळो न कळो रे
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे

-©आशुतोष अडोणी

(आर्त अनावर या पुस्तकातील लेख)

चित्र:- वासुदेव कामथ सर
Vasudeo Kamath