
मंगेशकर कुटुंबीयांचं या देशाच्या विकासात, जडणघडणीत कुठलाही वाटा नसल्याचा आणि या कुटुंबाने फक्त स्वतःच्या गायनासाठीच काम केल्याचा दावा करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी परवा देशासाठीचे मंगेशकर कुटुंबीयांचे योगदान शून्य ठरवत कडवट टीका केली आहे. सध्याच्या काळात कोण कोणावर कसला आरोप करेल, हे सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे. तिकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेना कार्यालयातून संजय राऊतांचा रोज सकाळी भोंगा वाजतो. बहुदा तीच सवय विजय वडेट्टीवार यांनाही जडली आहे.
त्यामुळे बहुतांश वेळी तेही नागपुरातून जमेल तेव्हा, जमेल तितका वेळ भोंगा वाजवतात. आता, समोर डायरी पेन किंवा माईक धरून उभ्या असलेल्या पत्रकारांशी रोज रोज बोलायचं तर बोलण्यासाठी काही मुद्दे तर हवेत ना! आणि आजकाल तर काय, पत्रकारही कुठल्याही मुद्द्यावर कुठल्याही नेत्याची प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी धडपडत असतात. त्या नेत्याचा त्या विषयाशी संबंध असो वा नसो, पण टीव्हीवर दाखवण्यासाठी आणि पेपरात खरडण्यासाठी एखादी प्रतिक्रिया हाताशी आली, की मग त्याची झणझणीत बातमी तयार करता येते, हा फॉर्म्युला आताशा सर्वांनाच ठाऊक झाला आहे. मंगेशकर कुटुंबीयांशी वडेट्टीवार यांचा काय संबंध? मंगेशकर कुटुंबाबाबत एखादा सवाल वडेट्टीवारांना का विचारावा, असा प्रश्न पत्रकारांच्याही मनात येत नाही. बरं, पत्रकारांनी विचारले तरी, त्यावर उत्तर देण्यासाठी, माझा या विषयाशी काय संबंध, याचा विचार करण्याची गरज वडेट्टीवारच काय, कुठल्याच राजकीय नेत्याला वाटत नाही, हे खरे दुर्दैव आहे. त्यामुळे, समोरून प्रश्न आला की स्वतःची अक्कल पाजळत प्रत्येक जण बेताल, बेधुंद बरळत सुटतो. अलीकडे पुण्याचे दीनानाथ मंगेशकर हाॅस्पिटल प्रकरण समोर आल्यापासून मंगेशकर कुटुंबीयांच्या देशासाठीच्या योगदानावर सर्वदूर चर्चा सुरू झाली आहे. देशासाठीचं योगदान म्हणजे नेमकं काय? सीमेवर लढणाऱ्या सैनिकाच्या भूमिकेत जगणे म्हणजेच देशासाठीचे योगदान असा जर प्रत्येकाचा समज असेल, तर मग सीमेवर लढणाऱ्या सैनिकांव्यतिरिक्त कोणीच देशभक्त नाही, असा निष्कर्ष काढावा लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे, आपल्या देशात कोणाला डोक्यावर घेऊन नाचायचं याचे तारतम्य सर्वसामान्य जनतेलाही राहिलेले नाही.
त्यामुळे क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंपासून तर संगीताच्या तालावर थिरकणाऱ्या एखाद्या बेसूर गायकांपर्यंत कुणालाही पब्लिक डोक्यावर घेऊन नाचते. आणि वडेट्टीवार यांच्या निकषांवर विचार करायचा झाला, तर मग क्रिकेट टीम मध्ये खेळणारे खेळाडू तरी पैशाव्यतिरिक्त अजून कशासाठी खेळतात सांगा? सिनेक्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे तरी याहून वेगळे काय गणित असते? ते तर लोकांनी दिलेल्या प्रेमाच्या भरवशावर मिळालेल्या लोकप्रियतेच्या जोरावर चिक्कार पैसा कमावतात आणि वर पुन्हा सेलिब्रिटी म्हणून व्हीआयपी कोट्यात मिरवतात. अहो, इतकंच कशाला, वडेट्टीवारांसहित या देशातले राजकारणी नेते तरी याहून वेगळं काय करतात? मंगेशकर कुटुंबीयांचे देशासाठी काहीच योगदान नसेल तर वडेट्टीवारांनी तरी कुठे देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे? सध्याच्या राजकीय क्षेत्रातील लोकांचे एकूणच वागणे बघितले आणि अल्पावधीत श्रीमंत होण्याचा त्यांनी शोधून काढलेला मार्ग बघितला की, त्यांच्याही देशासाठीच्या योगदानावर चर्चा व्हायलाच हवी ना! सांगण्याचा मुद्दा असा की, कलेच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या मंगेशकर कुटुंबीयांच्या देशासाठीच्या योगदानावर प्रश्नचिन्ह उभे करायचे झाले, तर या देशातल्या राजकारण्यांसहीत अनेकांसंदर्भात तसा प्रश्न उपस्थित करावा लागेल. आपापल्या क्षेत्रात पैसा कमावण्यासाठी केलेली मेहनत किंवा दिलेले योगदान म्हणजे देशासाठीचे काम नव्हे हा वडेट्टीवारांनी मांडलेला फॉर्म्युला जर मान्य केलाच तर या देशातले अनेक लोक देशभक्तीच्या स्पर्धेतून बाद होतील. आणि मग त्यांचे कुठलेच योगदान देशासाठी नाही या निष्कर्षाप्रत यावे लागेल.
पण विजय वडेट्टीवार यांनी मांडलेल्या या मुद्द्याचा देशातील सर्वसामान्य माणसांनी नक्कीच विचार केला पाहिजे, हे मात्र खरे! तो कोण कुठला कुणाल कामरा नावाचा कथित कलाकार. सध्या संपूर्ण समाजात भाव खाऊन जातो आहे. केवळ कुणाचीतरी सुपारी घेऊन दुसऱ्या विरुद्ध बरळला म्हणून त्याला काय देशभक्तीचे प्रशस्तीपत्र द्यायचे का आता? पण करता काय, या देशातली जनता सेलिब्रेटी पदाच्या नावाखाली कुणालाही डोक्यावर घेऊन नाचते, हे तर जळते वास्तव आहे. या पार्श्वभूमीवर एकदा प्रत्येकच व्यक्तीने स्वतःच्या देशासाठीच्या योगदानावर स्वतःलाच प्रश्न विचारला पाहिजे. शेवटी एखादा देश हा समाजातील विविध प्रकारच्या लोकांनी बनला असतो. तिथे सारेच राजकारणी नसतात, सारेच खेळाडू नसतात, सारेच कलावंतही नसतात.
पण तरीही प्रत्येकाचे आपापल्या क्षेत्रात योगदान असते. त्याचा आदर प्रत्येकानेच केला पाहिजे. या सर्वांनी मिळून समाजातील वंचितांसाठी दिलेले योगदान म्हणूनच महत्त्वाचे ठरते. तुम्ही आम्ही ज्याला देश मानतो, त्या भौगोलिक सीमेत बंदिस्त झालेल्या भूप्रदेशासाठीचे योगदान, हा तर त्याहून श्रेष्ठ आणि महत्त्वाचा भाग आहे. मंगेशकर कुटुंबीयांनी निदान दीनानाथांच्या नावावर लोकांच्या उपयोगात पडेल असे रुग्णालय तरी तयार केले आहे. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी असे कुठले कृत्य केले असेल, तर त्यांनी सांगावे. त्याचेही कौतुकच होईल. अन्यथा उगाच उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असा प्रकार ठरेल. आजच्या समाज माध्यमांच्या आणि स्पर्धेच्या युगात प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी समोरच्या व्यक्तीवर जमेल तेवढ्या खालच्या स्तरावर जाऊन टीका टिप्पणी करण्याचा जो प्रघात सुरू झाला आहे, तो समाज स्वास्थ्यासाठी योग्य नाही. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या योगदानाबाबत प्रश्नचिन्ह उभे करत असताना प्रत्येकाने एकदा स्वतःकडेही डोकावून पाहिजे, हे मात्र खरे!