संजय राऊतांच्या धमक्यांमुळे आम्हाला गुवाहाटीला जावे लागले, शिंदे गटाचा निवडणूक आयोगापुढे दावा

0

मुंबई : शिंदे गटाने गुवाहाटी का गाठले होते, असा प्रश्न वारंवार ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगापुढे उपस्थित केला जातोय. त्यावर आता शिंदे गटाकडून उत्तर (Shinde Group before in Election Commission) आलेय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडून त्यावेली सातत्याने धमक्या मिळत होत्या. लाठ्या मारा किंवा त्यांना दंडुक्याने बडवून काढा, आमदारांना महाराष्ट्रात परतणे व फिरणे कठीण होईल, असे इशारे दिले जात होते. त्यामुळेच आम्हाला परराज्यात जावे लागले, असा दावा शिंदे गटाने निवडणूक आयोगापुढे दिलेल्या लेखी उत्तरात दिलाय. काल निवडणूक आयोगापुढे दोन्ही गटांनी लेखी उत्तरे सादर केली. त्यात शिंदे गटाकडून हा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी आपण आमदारांन दंडुक्यांनी मारण्याची भाषा केलीच नव्हती, असा दावा केलाय.

काल शिंदे गटाने निवडणूक आयोगापुढे सविस्तर लेखी उत्तर सादर केले. त्यात शिंदे गटाने संजय राऊत यांच्याकडून त्यावेळी दिल्या गेलेल्या धमक्यांचा उल्लेख केलाय. आम्ही पक्षातच आहोत पण आम्हाला हे पाऊल का उचलावे लागले, याचे कारण देताना शिंदे गटाकडून संजय राऊत यांच्या वक्तव्याचा दाखला दिला आहे. जुलै महिन्यात सर्वोच्च न्यायालयात देखील शिंदे गटाने हाच दावा केला होता. त्यावेळी संजय राऊत यांचं हे वक्तव्य बंडखोर आमदारांसाठी इशारा समजले जात होते. आता या वक्तव्याचा कायदेशीर वापर शिंदे गटाकडून सुरु आहे.

 

दरम्यान, संजय राऊत यांनी अशा वक्तव्याचा इन्कार केला. त्यांना उत्तर द्यायला मी बांधील नाही व हे त्यांचे वैफल्य आहे, प्रत्येक लढाई ते हरणार आहेत, असे ते म्हणाले. बंड करून गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दंडुक्यांनी मारण्याची भाषा आपण केलीच नव्हती. लाठ्या मारा किंवा त्यांना दंडुक्याने बडवून काढण्याची भाषा सध्या त्यांच्याच गटात असणाऱ्या शीतल म्हात्रे यांनीच अलिबागच्या सभेत वापरली होती, असा दावाही त्यांनी केलाय.