हा तर उद्धव ठाकरेंच्या शरणागतीचा परमोच्च बिंदू-मुख्यमंत्री
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा आम्ही धिक्कार करतो, असे नमूद करताना उद्धव ठाकरे आणि त्यांचे आमदार हे राहुल गांधी यांचा हिरीरीने बचाव करताना दिसून आले आहेत. त्यामुळे हा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या आमदारांच्या शरणागतीचा परमोच्च बिंदू असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. या मुद्यावर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. राज्यात आगामी काळात सावरकर गौरव यात्रा काढण्यात ( Savarkar Gaurav Yatra) येणार असून त्यात राहुल गांधी यांचा निषेधही केला जाणार असल्याची घोषणा शिंदे यांनी यावेळी केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांबद्धल अपशब्द वापरणारे ज्येष्ठ काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांना जोडा मारला होता, याचे स्मरणही शिंदे यांनी उद्धव ठाकरेंन करून दिले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या स्वा. सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यभरात संतापाचे वातावरण आहे. स्वा. सावरकर यांचा वारंवार अपमान राहुल गांधी यांच्याकडून होत आहे. याचा मी जाहीर निषेध करतो. सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळून दिले. देशासाठी आंदोलन करताना त्यांनी काळ्यापाण्याची शिक्षा भोगली. त्यांच्या त्यागातून देशाला स्वातंत्र्य मिळालं असून याचा उपभोग आपण सगळे घेत आहोत. त्यामुळे या देशात लोकशाही आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपल्या पद्धतीने वावरण्याचा आणि निर्णय घेण्याचा अधिकार मिळाला.
ज्या देशभक्तांनी यासाठी त्याग केला, त्यांचा जाणीवपूर्वक अपमान केला जात असून याचा निषेध संपूर्ण देशभरात होत आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्यसमराव्यतिरिक्तही अनेक क्षेत्रात अत्यंत मोलाचे योगदान दिले. जाती निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, मराठी भाषेचा गौरव, मराठी भाषेला अनेक शब्द देण्याचे काम त्यांनी केले. कितीतरी क्षेत्रात त्यांनी योगदान दिले. प्रत्येक देशवासी त्यांच्या अतुलनीय योगदानाचा ऋणी आहे. संपूर्ण देश आणि विशेषतः महाराष्ट्र त्यांचे योगदान कधीच विसरू शकणार नाही. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यावर कायद्यानुसार कारवाई झाली असताना त्यांचा अत्यंत हिरीरीने बचाव करताना उद्धव ठाकरे आणि त्यांचे आमदार दिसून आले. असे करताना त्यांना वीर सावरकर यांचा अपमान दिसला नाही. हा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या आमदारांच्या शरणागतीचा परमोच्च बिंदू होता, या शब्दात शिंदे आणि फडणवीस यांनी समाचार घेतला. सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असा इशाऱ्या देणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी सहन करणार नाही म्हणजे नेमके काय करणार, या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे. त्यांनी दुतोंडी भूमिका घेऊ नये, असेही ते म्हणाले.