भाजपच्या पराभवासाठी विरोधकांचे ‘असे’ ऐक्य पुरेसे नाही-प्रशांत किशोर

0

नवी दिल्लीः भाजपाच्या विरोधात सगळे विरोधक एकवटले तरीही फक्त तेवढेच उपयोगाचे नाही. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा त्यांच्या पक्षाला फारसा काही फायदा होईल, असे वाटत नाही, असे परखड मत राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Election Strategist Prashant Kishor) यांनी मांडले आहे. विरोधी पक्षांची एकजूट हा फक्त एक देखावा आहे. फक्त नेते एकत्र आल्याने भाजपाला हरवणे शक्य नाही, असेही त्यांनी स्पष्टच सांगितले. प्रशांत किशोर यांनी एनडीटीव्ही या वाहिनीशी बोलताना विरोधकांना सल्लाही दिलाय. भाजपला आव्हान द्यायचे असेल तर त्याची बलस्थाने विरोधकांनी ओळखायला हवी, असा सल्ला त्यांनी दिलाय. भाजपला आव्हान द्यायचे असेल तर कुठल्याही विरोधी पक्षाला भाजपचे हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि कल्याणवाद काय आहे, हे समजून घ्यावे लागेल.
प्रशांत किशोर यांनी सांगितले की, हिंदुत्ववादी विचारधारांशी लढा देण्यासाठी विचारधारांची एकजूट आवश्यक आहे. गांधीवादी, आंबेडकरवादी, समाजवादी आणि कम्युनिस्ट या विचारधारा महत्त्वाच्या आहेत. मात्र, या विचारधारांच्या नावे तुम्ही अंधविश्वास ठेवू शकत नाही. त्या विचारधारा भाजपाच्या विचारधारेला टक्कर देऊ शकतात का? याचा विचार करावा लागेल. विरोधी पक्षाचे नेते एकमेकांच्या सोबत दिसत आहेत. कुणी कोणासोबत लंच करतेय तर कुणी चहा घेतेय. येथे विचारधारांची युती महत्वाची आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी एकत्र जेवण करणे आणि चहा पिणे ही भाजपाला हरवण्याची पद्धत नाही, असेही ते म्हणाले. राहुल गांधी यांनी जी भारत जोडो यात्रा काढली ती फक्त चालण्याशी संबंधित नव्हती. भारत जोडोसारखी यात्रा काढताना तुम्हाला पक्षामध्ये काही बदल झालेले दिसले पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.