सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारविरुद्ध कोणतेही निरीक्षण नोंदविलेले नाही: देवेंद्र फडणवीस

0

 

नागपूर : राज्य सरकारविरुद्ध कोणतेही निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदविलेले नाही. त्यामुळे राज्य सरकारला नपुंसक म्हटले असा कांगावा जे लोक करताहेत, त्यांची वक्तव्य न्यायालयीन कामकाजाच्या ज्ञानअभावातून आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी आज केले. नागपूर येथे माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारविरुद्ध कोणतेही निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदविलेले नाही.

राज्य सरकारने काय-काय कारवाई केली, हे सांगितल्यानंतर राज्य सरकारविरुद्ध अवमानना नोटीस किंवा कोणताही आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला नाही. याउलट इतर राज्यातही कोणकोणती वक्तव्ये केली जात आहेत आणि कसे महाराष्ट्राला पिनपॉईंट करण्याचा प्रयत्न होतो आहे, हे सॉलिसिटर जनरल यांनी लक्षात आणून दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एक सर्वसाधारण वक्तव्य केले की, सर्व राज्यांनीच कार्यवाही केली पाहिजे. सुप्रीम कोर्टाने कुठेही राज्य सरकारवर कोणतीही निर्णय दिला नाही, कोणतीही अवमानना कारवाई केली नसताना, जे राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत, त्यांना न्यायालयीन कार्यवाहीच समजत नाही. न्यायालय काय म्हणते हे ज्यांना समजत नाही, त्यांना उत्तर देण्याची काही एक गरज नाही.

छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या घटनेबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संभाजीनगरला घडलेली घटना दुर्दैवी आहे. तेथे शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतू काही नेते भडकावू वक्तव्य देऊन परिस्थिती चिघळविण्याचा प्रयत्न करताहेत. त्याांनी चुकीचे वक्तव्य देऊन परिस्थिती आणखी खराब करु नये. आपली शहरं शांत ठेवण्याचा प्रयत्न सर्वांना केला पाहिजे. आज मर्यादा पुरुषोत्तम श्री रामनवमी आहे. जे नेते राजकीय वक्तव्य देऊन तेथील परिस्थिती आणखी बिघडावी, असा प्रयत्न करताहेत, ते दुर्दैवी तर आहेच, पण त्यांची राजकीय बुद्धी किती छोटी असेल याचेही हे परिचायक आहे.