Home Artical Blog जंगलाच्या लगत एक कोटी 16 लक्ष रुपयांचे वृक्षारोपण

जंगलाच्या लगत एक कोटी 16 लक्ष रुपयांचे वृक्षारोपण

0

केंद्र सरकारकडून राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत प्रदूषण नियंत्रणासाठी आलेल्या निधीचा मनपाकडून पुन्हा दुरुपयोग

चंद्रपूर(Chandrapur):
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या दिनांक 27 एप्रिल रोजी संपन्न झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये कंपोस्ट डेपोच्या संरक्षण भिंतीच्या लगत एक कोटी 16 लक्ष रुपयाची वृक्षारोपण करण्याचा निर्णय मनपातील स्थायी समितीच्या सत्ताधारी सदस्यांनी घेतला. या विषयाचा महानगर आघाडीचे गटनेते पप्पू देशमुख यांनी विरोध केला. काँग्रेसचे गटनेते स्थायी समिती सदस्य राजेश अडूर तसेच काँग्रेसचे इतर स्थायी समिती सदस्य वसंत देशमुख, विनोद लभाने, चंदा वैरागडे,सफिया खान, संजीवनी वासेकर यांनी सुद्धा या कामाला विरोध दर्शविण्यासाठी हात वर करून मतदान केले. मात्र काँग्रेसचे स्थायी समिती सदस्य सचिन कत्तल अनुपस्थित राहिल्यामुळे आठ विरुद्ध सात मताने हा विषय मंजूर झाला. यानंतर स्थायी समिती सदस्य पप्पू देशमुख यांनी सत्ताधाऱ्यांच्या मनमानीचा निषेध करून सभात्याग केला.
राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारकडून मनपाला दरवर्षी निधी येतो. या निधीतून शहरातील हवेचा दर्जा सुधारण्यासाठी कामे करणे अपेक्षित आहे. मात्र चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील मागील अनेक वर्षापासून या निधीचा सर्रासपणे दुरुपयोग होत आहे. राष्ट्रीय शुद्ध व कार्यक्रमांतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून यापूर्वी बागला चौक व आदर्श पेट्रोल पंपा जवळील उत्तम स्थितीत असलेले रस्ता दुभाजक तोडून नवीन रस्ता दुभाजक तयार करण्याचे साडेतीन कोटी रुपयांचे काम मंजूर करण्यात आले होते. नगरसेवक पप्पू देशमुख यांनी विरोध केल्यानंतर आदर्श पेट्रोल पंप जवळील रस्ता दुभाजक तोडण्याचे काम रद्द करण्यात आले. बागला चौकातील कंत्राटदाराची देयके थांबवण्यात आले. शहरात विविध ठिकाणी कोट्यावधींची फाउंटेन उभारण्याची कामे याच निधीतून मंजूर करण्यात आली. देशमुख यांनी लेखी विरोध केल्यानंतर रामाळा तलाव व सावरकर चौक या ठिकाणच्या फाउंटन ची कामे रद्द करण्यात आली. या निधीतून झालेली अनेक फाउंटेन सध्या बंद अवस्थेत आहे.
शहरातील नागरिक प्रदूषणाने त्रस्त असताना राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत आलेल्या निधीचा दुरुपयोग होणे अत्यंत गंभीर आहे. काही विशिष्ट कंत्राटदारांच्या हितासाठी कामे मंजूर करून शासकीय व मनपाच्या निधीचा दुरुपयोग केल्या जात असल्याचा आरोप महानगर आघाडीचे जनतेचे देशमुख यांनी एका पत्रकाद्वारे केला.