भारतीय हवामान खात्याने 14 ते 16 मार्च दरम्यान बुलडाण्यात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची व मेघ गर्जनेसह विजांचा गडगडात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.. मार्च मध्ये अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, काढणीला आलेल्या गहु, हरबरा, मका, तसेच रब्बी पिकांना या पावसाने गाठले आहे.. तर जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांनी कापणी केलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, साठवणुकीची व्यवस्था नसल्यास संबंधित शेतमाल प्लास्टिक ताडपत्रीने झाकून ठेवावा,संभाव्य अवकाळी पावसाची शक्यता पाहता,परिपक्व झालेल्या हरभरा,गहु पिकाची त्वरित कापणी करावी व कापणी, मळणी केलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. साठवणूकीची व्यवस्था नसल्यास संबंधित शेतमाल प्लास्टिक शीटने किंवा ताडपत्रीने झाकून ठेवावा.. कापणी, तोडणी केलेली फळे, भाजीपाला सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, जेणेकरून संभाव्य पावसाने फळांची व भाजीपाल्याची गुणवत्ता खालावणार नाही..तसेच मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट होण्याची शक्यता असल्याने जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावीत..विजांबाबत अचुक पुर्वसुचना प्राप्त होण्यासाठी व जिवीतहानी टाळण्यासाठी शेतकरी बंधूंनी दामिनी मोबाईल अॅपचा वापर करावा..असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा यांच्या कडून करण्यात आले आहे.
तत्पूर्वी मागील आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या गहू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही विधानसभेत शेतकऱ्यांची बाजू मांडत त्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. अजित पवार विधानसभेत म्हणाले होते की, ”नाशिक, धुळे, बुलडाणा, पालघर, बीड, जालना, पुणे ,अहमदनगर, वाशिम, सोलापूर आणि राज्यातील इतर भागात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा, गहू, हरभरा, सोयाबीन, मका, तूर, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच कापणीला आलेला गहू जमीनदोस्त झाला आहे, आंबा, काजू, द्राक्षे, केळी, संत्रा, लिंबू, पपई, कलिंगड यासारख्या अनेक फळपीकांबरोबरच हरभरा, तूर, मका, वाल, चवळी, पावटा व इतर रब्बी पालेभाज्या यांचेही नुकसान झालेले आहे. वीज अंगावर पडून जनावरे दगावली आहेत, मेंढ्यासुद्धा मृत झाल्या आहेत. शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडला आहे आंबा, काजू सारख्या पिकांचा मोहोर, व संत्रा लिंबू यांची फळे गळल्याने उत्पादनावर विपरीत परीणाम होणार आहे. शेतकरी दुहेरी अडचणीत सापडल्याने सरकारने या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.”
विरोधी पक्षनेत्यांना उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवकाळी पावसामुळे राज्यातील 13 हजार 729 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती दिली होती. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले होते.