भंडारा : विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप दबावतंत्राचा वापर करीत असून त्याची त्यांना भरपाई करावी लागेल असा दावा करताना महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) राज्यातील पाचही जागा जिंकेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (State Congress President Nana Patole) यांनी व्यक्त केलाय. भंडारा येथे बोलताना पटोले यांनी राज्यातील उमेदवारीचे चित्र दुपारी तीन वाजता स्पष्ट होईल असे सांगितले. पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी भाजपचा डाव ओळखळा असून ते भाजपला धडा शिकवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आम्ही महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणून लढत असल्याने नाशिक आणि नागपूरमध्ये जागांच्या अदलबदलीचा प्रश्नच नाही, असेही त्यांनी सांगितले.
भाजपची घर फोडण्याची प्रवृत्ती आहे. त्यांची ही प्रवृत्ती जनतेसमोर नेऊन चांगला धडा शिकवू, असा निर्धारही पटोले यांनी व्यक्त केला. नाशिकमधील काँग्रेसचे माजी आमदार सुधीर तांबे यांचे निलंबन पक्षविरोधी कारवाईमुळेच झाले असल्याचे त्यांनी सांगितले. सुधीर तांबे यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियावर बोलण्यात पटोले यांनी नकार दिला. राज्यातील उमेदवारीचे चित्र सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले. न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप करण्याचे भाजपचे प्रयत्न सुरु असून हे कृत्य संविधानासाठी धोकादायक असल्याचा आरोप पटोले यांनी केला. आपल्या मर्जीतील लोकांना न्यायाधीश म्हणून नियुक्ती दिली जात आहे. या पद्धतीने सांविधानिक धोका निर्माण झाला असल्याचे पटोले म्हणाले. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पटोले हे भंडारा येथे आले होते. यावेळी त्यांनी संवाद साधला.