नागपूर-दिशा सालियान मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आल्यावर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray On Disha Salian Case SIT Probe) यांनी या मुद्यावर प्रथमच भाष्य केले. ज्या प्रकरणात काहीच पुरावे नाहीत, त्यावर एसआयटी लावली जाते. मात्र, आम्ही जे पुराव्यांसह मांडतोय, त्यावर एसआयटी लावली जात नसल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
भाजपकडून (BJP) दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर आरोप केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य केले. ठाकरे म्हणाले की, अधिवेशनाची सुरुवात झाली तेव्हाच अधिवेशन अधिवेशन वेगळ्या ठिकाणी जाते आहे, असा संशय आला होता. ज्याचा दुरान्वयेही एखाद्या घटनेशी संबंध नाही, अशा प्रकरणातही एसआयटी चौकशी लावली जाते. मात्र, विरोधकांनी उपस्थित केलेले मुद्दे व दिलेल्या पुराव्यांविरोधात एसआयटी लावली जात नाही. अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी महत्त्वाचे मुद्दे आहेत. मात्र, दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पिक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना पिक विमा दिला जात नाही. त्यांच्याबद्दल एसआयटी चौकशी का करत नाही, असा सवाल त्यांनी केला.















