Home MAHARASHTRA मतदारांना साद घालून विधानसभा शिवसेना स्वबळावर लढणार?

मतदारांना साद घालून विधानसभा शिवसेना स्वबळावर लढणार?

0

मुंबई(Mumbai) १७ जून :- कोकणात शेकाप, कॉंग्रेस आणि शरद पवार यांच्या पक्षचाकडून मोठ्या प्रमाणात मुस्लिम दलितांची मते मिळूनही शिवसेनेची हक्काची मराठी हिंदूत्वाची मते दुरावली आहेत. त्यामुळे कॉंग्रेस सोबतचा घरोबा कमी करत जुन्या परंपरागत मतदारांना हाक घालून विधानसभा शिवसेना स्वबळावर लढली तरी किमान ६० ते ८० जागांवर विजय मिळू शकेल. त्यामुळे पुरोगामी पक्षांपासून अंतर ठेवून भाजपसमोर प्रखर हिंदुत्वाचा चेहरा घेवून स्बबळावर शिवसेना लढल्यास ठाकरे यांना विधानसभेत मुख्यमंत्रीपदावर दावा सांगता येण्यासारखी स्थिती असेल, अशी माहिती सेना भवनातील विश्वसनीय सूत्रानी अनौपचारीक चर्चेदरम्यान दिली आहे.

या सूत्रांच्या माहितीनुसार चोवीस तासांपूर्वीच प्राथमिक बैठक झाली असताना विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने शिवसेनेपेक्षा जास्त लढविण्याची अपेक्षा जाहीर करत शंभर जागांवर दावा सांगितल्याने खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना उबाठा यांच्यातही अनेक जागांवर उमेदवार देण्यावरून वाद होण्यास सुरूवात झाल्याने महाविकास आघाडीला एकसंधपणे वाटचाल करणे कठीण होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूकीचा अनुभव लक्षात घेता शिवसेनेकडुनही स्वबळाची चाचपणी केली जात असल्याने आघाडीचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

राज्यात भाजप महायुतीला धोबीपछाड देत शरद पवार(Sharad Pawar) आणि उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी आपले राजकीय अस्तित्व दाखवून देत असतानाच भाजपलाही त्यांची राजकीय जागा दाखवून दिली आहे. मात्र आता विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीचे आव्हान वाढले आहे. याची कारणे अनेक आहेत, त्यातही सर्वात मोठे कारण या आघाडीतील शिवसेना ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार आणि आता मोठ्या प्रमाणात बळ मिळालेली कॉंग्रेस यांच्या पक्षांतर्गत आणि आपसातील समन्वयातून जागावाटप आणि उमेदवार निवडण्याचे महादिव्य या तीनही पक्षांना करातचे आहे. त्याशिवाय छोट्या सहयोगी पक्ष आणि पक्षातून बाहेर गेलेल्यांकडून पुन्हा सोबत येण्याच्या अपेक्षांसह सामान्य नागरीकांच्या अपेक्षांचा भार सहन करून राजकीय वाटचाल या आघाडीला करायची आहे.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आता विधानसभा निवडणुकीत मोठा भाऊ म्हणून कॉंग्रेसला शंभर जागा तर शिवसेना ९५ आणि शरद पवार यांच्या पक्षाला ८५ जागांचा प्रस्ताव छोटे सहकारी पक्ष आणि महाविकास आघाडीत होवू घातलेले संभाव्य इनकमिंग धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर आणि कम्युनिस्ट पक्ष, शेकाप, समाजवादी पक्ष आणि अन्य छोट्या पक्षांकडूनही जागा वाटपात स्थान देण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी मध्ये समन्यायी जागावाटप होण्यापूर्वीच स्थिती तणावाची होण्याची चिन्ह आहेत. मोठ्या प्रमाणात तिन्ही पक्षांकडे सक्षम उमेदवारांची रिघ लागण्याची सुरूवात झाली असून संभाव्य राजकीय समिकरणांमुळे सत्ता येण्याची शक्यता असताना दुसरीकडे योग्य जागावाटप होण्यात अडचणी झाल्यास मोठ्या प्रमाणात बंडखोर उमेदवार उभे राहण्याची शक्यता आहे, त्याचा फायदा भाजप आणि महायुतीला होण्याची शक्यता आहे.

शिवसेना उध्दव ठाकरे गटातील ज्येष्ठ नेत्यांच्या मताप्रमाणे लोकसभा निवडणुकीत जितका फायदा शिवसेनेला सहकारी पक्षांच्या मतदानाचा व्हायला हवा होता तितका तो का होवू शकला नाही याचा अभ्यास केला जात असून कोकणात शेकाप, कॉंग्रेस आणि शरद पवार यांच्या पक्षचाकडून मोठ्या प्रमाणात मुस्लिम दलितांची मते मिळूनही शिवसेनेची हक्काची मराठी हिंदूत्वाची मते दुरावली आहेत. त्यामुळे कॉंग्रेस सोबतचा घरोबा कमी करत जुन्या परंपरागत मतदारांना हाक घालून विधानसभा शिवसेना स्वबळावर लढली तरी किमान ६० ते ८० जागांवर विजय मिळू शकेल. त्यामुळे पुरोगामी पक्षांपासून अंतर ठेवून भाजपसमोर प्रखर हिंदुत्वाचा चेहरा घेवून स्बबळावर शिवसेना लढल्यास ठाकरे यांना विधानसभेत मुख्यमंत्रीपदावर दावा सांगता येण्यासारखी स्थिती असेल.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची वोट बँक सेक्युलर मतांची असली तरी शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या मराठी मतांना बाजुला ठेवून जाणे भविष्यात महापालिका निवडणुकीत नुकसानाचे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना स्वतंत्रपणे स्वबळावर लढण्याचा पर्याय शोधण्याची शक्यता आहे. त्यात प्रकाश आंबेडकरांच्या वंचित सोबत युती करून जाण्याची स्थिती आल्यास पुन्हा एकदा भिमशक्ती शिवशक्ती आणि हिंदुत्वाचा घोळ होण्याची शक्यता आहे. तर शरद पवार यांच्या बेरजेच्या राजकाराणाला तोडून जाणे ठाकरे यांना कितपत जमेल आणि शक्य होण्याची स्थिती असेल यावर विचार सुरू झाला आहे.