विदर्भाला पुन्हा पावसाचा यलो अलर्ट राजुऱ्यात वीज कोसळून ७ जखमी

0

चंद्रपूर. राज्यातील अनेक जिल्ह्यांना गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने तडाखा दिला. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यातून सावरण्यापूर्वीच विदर्भावर पुन्हा एकदा अवकाळीचे संकट (Unseasonal rain crisis again in Vidarbha ) घोंगावते आहे. हवामान विभागाने (Meteorological Department ) २५ आणि २५ मार्चला पावसाचा अंदाज व्यक्त करीत यलो अलर्ट (yellow alert ) दिला आहे. या अलर्टपूर्वीच शुक्रवारी दुपारी चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील मौजा सिंधी येथे शेतशिवारात वीज कोसळल्याने काम करणारे सात जण जखमी झाले. आता पुन्हा अवकाळीचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे. हवामान विभागाने राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान असून २५ मार्चला उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वीजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. पावसासोबतच पाराही वाढण्याची शक्यता आहे.
राजुरा तालुक्यातील सिंधी येथे अचानक वीज कोसळली त्यावेळी शेतमालक मधुकर धानोरकर, त्यांची पत्नी व अन्य १५ मजूर काम करीत होते. घटनेत मधुकर धानोरकर, उषा सुरेश चौधरी, किरण पुरुषोत्तम चौधरी, माधुरी भास्कर मोरे, मंदाबाई मधुकर धानोरकर, मृणाल शेषराव बोबडे, अर्चना सुनील चौधरी हे जखमी झाले. सर्वांना उपचारार्थ ग्रामीण रुग्णालय राजुरा येथे दाखल करण्यात आले आहे. मधुकर धानोरकर व उषा चौधरी यांची प्रकृती गंभीर आहे. आता पुन्हा विदर्भासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांचा, तर मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यांचा समावेश आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात वादळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
तामिळनाडूपासून, रायलसीमा, उत्तर अंतर्गत कर्नाटक ते विदर्भापर्यंत समुद्रसपाटीपासून जवळपास ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. याशिवाय यातच नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावर तसेच रायलसीमा आणि परिसरावर चक्रीवादळाची स्थिती आहे.