अल्टीमेटम देण्याचा अधिकार सर्वांनाच

0

सुधीर मुनगंटीवार यांचा संजय राऊतांना टोला


मुंबई. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj ) यांच्याविषयी केलेल्या विधानानंतर राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. हेच प्रकरण उद्धव ठाकरे गटाने लावून धरले असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या निषेधार्थ सर्व पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी उद्धव ठाकरेंच्या याच आवाहनाचा पुनरुच्चार केला. राज्यपालांनी केलेल्या विधानाविरोधात लवकरच कठोर पावले उचलण्यात येतील. उद्धव ठाकरेंनी त्याबाबत अल्टिमेटम दिलेला आहे, असे विधान केले आहे. राऊतांच्या या विधानावर आता भाजपाचे नेते तथा मंत्री सुधीर मुनगंटीवार (Minister Sudhir Mungantiwar) यांनी भाष्य केले आहे. माध्यम प्रतिनिधींशी बोलत बोलताना ते म्हणाले की, जोपर्यंत सूर्य, चंद्र, पृथ्वी आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत. ते शूरवीर आणि जानते राजे आहेत.अल्टिमटेम कोणत्याही राजकीय पक्षाला देता येतो. अल्टीमेटम देण्याचा कोणालाही अधिकार आहे, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी राऊतांना लगावला.


नवी मुंबईत आसाम भवन आहे. महाराष्ट्रात सगळ्याच राज्यांना जागा हवी आहे. पण महाराष्ट्राला कोणी कधी जागा देणार का, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. राऊतांच्या या प्रश्नालादेखील मुनगंटीवार यांनी उत्तर दिले. आपल्याला तिरुपती मंदिराच्या ट्रस्टीमध्ये महाराष्ट्राला जागा मिळाली. उद्धव ठाकरे यांचे सचिव या मंदिराच्या ट्रस्टीमध्ये आहेत. आपल्याला दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन आहे. आपण जागा मागितल्यास ती उपलब्ध होईल. मात्र आपण जागाच मागितली नसेल तर ती उपलब्ध होण्याचा प्रश्न नाही. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे इतर राज्यांना मुंबईत जागा हवी असते. आपल्याला इतर राज्यांमध्ये कमी काम असते. मात्र आपल्या राज्यात इतर राज्यांना काम असते. यामुळे अनेक राज्ये मुंबईमध्ये जागा मागतात, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. दरम्यान, राज्यपालांच्या शिवाजी महाराजांसंदर्भातील आक्षेपार्ह विधानाची धक अद्याप कमी झाली नाही. त्यांच्या विधानावरून आरोप- प्रत्यापोर, दावे – प्रतिदावे सुरूच आहेत.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा