नागपूर, 8 नोव्हेंबर
विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी महोत्ववानिमित्त वर्धा येथे आयोजित होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक व निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली आहे, अशी घोषणा अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे यांनी वर्धा येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केली.
मंगळवारी प्रा. उषा तांबे यांच्या अध्यक्षतेत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक पार पडली. यात विविध घटक संस्थांकडून प्राप्त झालेल्या नावांवर चर्चा करण्यात आली. त्यातून न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीला महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्रकाश पागे, उपाध्यक्ष रमेश द. वंसकर, विद्यमान संमेलनाध्यक्ष डॉ. भारत सासणे, मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे व कार्यकारिणी सदस्य तसेच, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, विलास मानेकर, गजानन नारे इत्यादी उपस्थित होते.
96 वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन दिनांक ३,४ आणि ५ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत वर्धा येथील स्वावलंबी शाळेच्या भव्य पटांगणावर होत आहे. या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी श्री. दत्ताजी मेघे यांनी स्वीकारली असून संरक्षपदाची जबाबदारी समीर मेघे यांनी सांभाळली आहे. या साहित्य संमेलनाच्या मार्गदर्शक केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीनजी गडकरी हे आहेत. विदर्भ साहित्य संघ ही या संमेलनाची निमंत्रक संस्था आहे.
या संमेलनाचे उद्घाटन ३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता होईल. त्यापूर्वी महामंडळाचे ध्वजारोहण करण्यात येईल. ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन २ फेब्रुवारीला पूर्वाध्यक्षांच्या डॉ. भारत सासणे यांच्या हस्ते होणार असून यात साधारणत: ३०० गाळे राहणार आहेत. संमेलनाची सुरुवात प्रथेनुसार ग्रंथदिंडीने 3 तारखेला सकाळी ८.३० वाजता होईल. मुलाखत, परिसंवाद, प्रकाशन कट्टा, वाचक कट्टा, कवी संमेलने, कवी कट्टा, असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. संमेलनाचा समारोप ५ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ४.०० वाजता होईल, अशी माहिती प्रा. उषा तांबे यांनी दिली. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी हे संमेलन वेगळ्या पद्धतीने व कायम लक्षात राहावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
प्रा. उषा तांबे म्हणाल्या, आजवर साहित्य संमेलनाला लेखक, कवी अध्यक्ष म्हणून लाभले. पण यावेळी नरेंद्र चपळगावकर यांच्या रूपाने विचारवंत लेखक तसेच, तर्कनिष्ठ व तत्वनिष्ठ भूमिका असलेला साहित्यिक संमेलनाध्यक्ष झाले आहेत.
निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर यांचा परिचय
नरेंद्र चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश असून वैचारिक लेखन करणारे एक संवेदनाशील व सत्त्वशील मराठी लेखक आहेत. न्यायाधीश होण्यापूर्वी ते सन १९६१-६२मध्ये ते लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते. ते सध्या गरवारे पॉलिएस्टर लिमिटेडमध्ये कार्यरत असून नरहर कुरुंदकर न्यासाचे एक विश्वस्त आहेत. ते औरंगाबाद येथे वास्तव्यास असतात.
चपळगावकर यांचे अनेक वृत्तपत्रांतून लेख प्रसिद्ध झाले असून ललित, भाषाविषयक, समीक्षा, न्यायविषयक कथा, व्यक्तिचित्रणे प्रकाशित आहेत. राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन, मसापच्या विभागीय मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. भैरुरतन दमाणी पुरस्कारासह त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
चपळगावकर यांची प्रतिक्रिया
दरम्यान, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर चपळगावकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करून आभार मानले आहेत. ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हा मराठी भाषा मराठी साहित्य यांच्याबद्दल आपले मत मांडण्याची मोठी संधी आहे, असे मी मानतो. ही संधी मला दिल्याबद्दल मी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे आभार मानतो’ अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
संवेदनशील लेखक
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे निवृत्त न्यायाधीश चपळगावकर हे न्यायाधीश होण्यापूर्वी लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते. त्यानंतर त्यांनी वकीलीच्या व्यवसायात पदार्पण केले. चपळगावकर यांनी संघर्ष आणि शहाणपण, दीपमाळ, आठवणीतले दिवस आणि कायदा आणि माणूस यासारख्या पुस्तकांचे लेखन केले आहे. या शिवाय त्यांनी अनंत भालेराव : काळ आणि कर्तृत्व, आठवणीतले दिवस, कर्मयोगी संन्यासी (स्वामी रामानंदतीर्थ यांचे चरित्र),कहाणी हैदराबाद लढ्याची, तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ, तुमच्या माझ्या मनातलं (ललित), त्यांना समजून घेताना (ललित), नामदार गोखल्यांचा भारत सेवक समाज, नामदार गोखल्यांचं शहाणपण, न्यायमूर्ती केशवराव कोरटकर, न्यायाच्या गोष्टी (न्यायविषयक कथा), मनातली माणसं (व्यक्तिचित्रणे), महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना, राज्यघटनेचे अर्धशतक, विधिमंडळे आणि न्यायसंस्था : संघर्षाचे सहजीवन, संघर्ष आणि शहाणपण, समाज आणि संस्कृती, संस्थानी माणसं (व्यक्तिचित्रणे), सावलीचा शोध (सामाजिक), हरवलेले स्नेहबंध आदी पुस्तके लिहिलेली आहेत.
