गडचिरोलीचा भास्कर अमेरिकेत वैज्ञानिक

0

प्रेरणादायी प्रवास ; आश्रमशाळेतून घेतले शिक्षण
गडचिरोली. प्रवाहासोबत सारेच पोहोतात. तर, विरुद्ध दिशेने पोहण्याचा ध्यास घेणारेच इतिहास घडवितात. पण, ध्यासाठी अनेक आघात सोसण्याची तयारी लागते. गडचिरोलीतील (Gadchiroli) आदिवासी मुलानेही (tribal boy ) जिद्द बाळगली. ध्येयासोबत अधिही तडजोड केली नाही. आज इच्छित स्थान प्राप्त केले. पण, हा प्रवास काही सोबा नव्हता. घरी अठराविश्व दारिद्र्य. गरजा भागविण्यासाठीही मोठा संघर्ष करावा लागायचा. पण, परिस्थितीला शरण न जाता संघर्ष कायम ठेवला. जिद्द, चकाटी आणि परिश्रमाच्या बळावर उच्च शिक्षण घेतले. अमेरिकेची वाट धरली. तिथे वैज्ञानिकपद निवड (Scientist in America) झाली. गडचिरोली जिल्ह्यातील चिरचाडी गावातील रहिवासी डॉ. भास्कर हलामी यांचा हा प्रेरणादायी प्रवास आहे. आश्रमशाळेतून शिक्षण घेत त्यांनी इच्छीत ध्येय साध्य केले. त्यांच्यावर आता सर्वच क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.
कुरखेडा तालुक्यातील चिरचाडी या छोट्याशा गावी एका गरीब आदिवासी कुटुंबात जन्मलेले भास्कर हलामी आज अमेरिकेतील एका मोठ्या कंपनीत वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत. या प्रवासाबद्दल ते संगातात, घरची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे प्राथमिक शिक्षण घेणेसुद्धा कठीण होते. मात्र, जेमतेम सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या माझ्या वडिलांना मी उच्च शिक्षण घ्यावे, असे नेहमीच वाटायचे. म्हणून त्यांनी एकवेळ पोटाला मारून मला शिकवले. वडिलांना कसनसूर येथील आश्रमशाळेत कामठी म्हणून नोकरी लागली. त्याठिकाणीच प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्याचे ते सांगतात. त्यानंतर यवतमाळ येथील केळापूर येथे दहावीपर्यंत शिक्षण घेऊन पुढे नागपुरातील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून रसायनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पुढे बीएड केले. प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून काही काळ नोकरीदेखील केली. अशातच नागपुरातील लक्ष्मीनारायण तंत्रज्ञान संस्थेत प्राध्यापक म्हणून रूजू झाले. काही वर्षे येथे घालावल्यानंतर त्यांना राज्य शासनाकडून उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती प्राप्त झाली. या माध्यमातून त्यांनी मिशिगन विद्यापीठातून पीएचडी मिळवली. या यशानंतर त्यांना अमेरिकेतील वॉशिंग्टनजवळ असलेल्या एका औषध निर्मिती क्षेत्रातील मोठ्या कंपनीत वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून नोकरी लागली. दरम्यान, त्यांना प्रचंड संघर्षाला सामोरे जावे लागले. आज ते पत्नी व दोन मुलांसह अमेरिकेत वास्तव्यास आहे. महिनाभरासाठी ते आपल्या गावी चिरचाडी येथे आले आहेत. आई-वडिलांच्या इच्छाशक्तीनेच मी आज घडलो असे ते आवर्जून सांगतात.
देश आज सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे. तरीही आदिवासी समाजात पाहिजे त्या प्रमाणात शिक्षणाचे महत्त्व दिसून येत नाही. यासाठी सामाजिक आणि आर्थिक स्थिती कारणीभूत असली तरी समाजातील मुलांनी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करावे. यासाठी भास्कर आग्रही आहेत. म्हणून ते शक्य ती मदत करण्यास तत्पर असतात. त्यांनी महिनाभराच्या काळात गावात ग्रंथालय सुरू केले. रोज त्याठिकाणी मुलांना मार्गदर्शन करतात. पुढेही समाजातील मुलांना शिक्षणासाठी शक्य ती मदत करण्यास आपण तयार असल्याचे ते सांगतात.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा