![New Project - 2022-11-22T133321.915](https://shankhnaad.live/wp-content/uploads/2022/11/New-Project-2022-11-22T133321.915.jpg)
नागपूर : संपूर्ण देशासाठी मानबिंदू असलेल्या दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला तातडीने गती द्या, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत आयोजित बैठकीत दिले.नागपूर शहर आणि जिल्ह्याच्या विविध प्रश्नावर एक मॅरॉथॉन बैठक आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके, समीर मेघे, विकास कुंभारे, मोहन मते, आशीष जयस्वाल, कृष्णा खोपडे, टेकचंद सावरकर आदी लोकप्रतिनिधी तसेच माजी मंत्री सुलेखा कुंभारे, मुख्य सचिव, विविध विभागांचे सचिव, नागपूरच्या विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपायुक्त, नासुप्र, एनएमआरडीए अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.संत जगनाडे महाराजांचे स्मारकाचा वाढीव खर्च पाहता तो तत्काळ प्रशासकीय मंजुरीसाठी सादर करण्यात यावा, या स्मारकाच्या निविदा अंतिम टप्प्यात आहेत. या स्मारकासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही, असे देवेेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ड्रॅगन पॅलेस टेंपलला सुद्धा आवश्यक निधी देण्यात येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटरसाठी 22 कोटी, शांतिवनसाठी 7.76 कोटी रूपये देण्यात येणार आहेत. याही कामाला गती देण्यात यावी. 118 कोटी रुपये खर्च करून संत चोखामेळा वसतीगृहाचे काम करण्यात येणार आहे. भविष्यातील गरजा ओळखून हे वसतीगृह 13 मजली करुन 1000 विद्यार्थी क्षमतेचे ते असावे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
![](https://shankhnaad.live/wp-content/uploads/2022/11/New-Project-2022-11-22T133321.915-1.jpg)