नक्षल समर्थक आनंद तेलतुंबडे यांना उच्च न्यायालयाकडून जामीन, निकालाला आठवडाभराची स्थगिती

0

मुंबई: भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला (Bail for Naxal Sympathiser Anand Teltumbde) आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, तेलतुंबडे यांना जामीन मंजूर झाला असला तरी त्यांना तुर्तास तळोजा कारागृहाबाहेर येता येणार नाही. एनआयएने या आदेशावर सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर उच्च न्यायालयाने या आदेशाला आठवडाभरासाठी स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर आनंद तेलतुंबडे यांच्या जामीन अर्जावरील याचिकेवर सुनावणी पार पडली. आनंद तेलतुंबडेंची याचिका योग्य ठरवत मुंबई उच्च न्यायालयाकडून त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.
एनआयएकडून अटक
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रा. तेलतुंबडे यांना भीमा कोरेगाव-एल्गार परिषद प्रकरणात 14 एप्रिल 2020 मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अटक केली होती. ते सध्या नवी मुंबईतील तळोजा कारागृहात आहेत. विशेष न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर तेलतुंबडे यांनी गेल्या वर्षी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने निकाल दिला. तेलतुंबडे यांच्या वतीने याचिकेत दावा करण्यात आला होता की, 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात आयोजित एल्गार परिषदेच्या कार्यक्रमात ते उपस्थित नव्हते. त्यांनी कोणतेही प्रक्षोभक भाषणही केले नव्हते.
सुटका नाहीच
दरम्यान, आनंद तेलतुंबडे यांना जामीन मिळाला असला, तरी त्यांना आणखी आठवडाभर तुरुंगातच राहावे लागणार आहे. कारण एनआयएने (NIA) सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची परवानगी मागितल्याने हायकोर्टाकडून जामीनाच्या निकालाला आठवड्याभराची स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे जामीन मंजूर झाल्यानंतरही आनंद तेलतुंबडे यांना तुर्तास तुरुंगातच राहावे लागणार आहे. त्यांची सुटका सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून राहणार आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा