![New-Project-2022-11-26T141829.234](https://shankhnaad.live/wp-content/uploads/2022/11/New-Project-2022-11-26T141829.234.jpg)
मुंबई. शिंदे गटाचे आमदार खासदार आज गुवाहाटीला (Guwahati) रवाना झाले. या दौऱ्यात शिंदे गटातील पाच ते सहा आमदारांनी दांडी मारल्याने चर्चा सुरू झाली आहे. वैयक्तिक कारणांमुळे हे आमदार येत नसल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात असताना त्यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant ) यांनी गुवाहाटीला रवाना होण्यापूर्वी विमानतळावर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोठा दावा केला आहे. चर्चा काहीही असो आम्ही सगळे एकसंघ आहोत. येताना कदाचित आमच्याकडे जास्त लोक (We may have more people while coming) असतील, असे सामंत म्हणाले. या विधानानंतर तर्क वितर्क लावण्याचा क्रम सुरू झाला आहे. हे विधान ठाकरे गटाचा रक्तदाब वाढविणारेही ठरले आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट यांच्यात राजकीय कलगीतुरा चालू असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपासह सत्ता स्थापन केल्यानंतर शिंदे गटावर ठाकरे गटाकडून सातत्याने खोके सरकार किंवा गद्दार सरकार अशी टीका केली जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाकडून मध्यावधी निवडणुकांविषयी दावे केले जात असून लवकरच या निवडणुका लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर उदय सामंत यांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. मला वाटते मध्यावधी निवडणुका लागण्याचा प्रश्नच येत नाही. काही लोकांना भीती वाटते की आपल्याकडचे लोक इकडे-तिकडे जातील की काय! त्यामुळे त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी हे सगळे चालले आहे. सत्ता येणार आहे हे त्यांना कायमस्वरूपी सांगत राहण्यासाठी असे बोलले जाते. यामागे फार मोठे राजकारण असल्याचे सामंत म्हणाले.
अजित पवारांचा खोचक टोला!
शिंदे गटातील आमदार आज पुन्हा एकदा गुवाहाटीत दाखल झाले असून कामाख्या देवीच्या दर्शनाला ते जाणार आहेत. तीन महिन्यांपूर्वी बोललेला नवस फेडण्यासाठी पुन्हा गुवाहाटी दौऱ्यावर जात असल्याची प्रतिक्रिया शिंदे गटातील आमदारांकडून देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून विरोधी पक्षनेते अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना या दौऱ्यावर खोचक टीका केली आहे. ते कामाख्या देवीच्या दर्शनाला चालले आहेत. काही ठिकाणी आपण बकरे कापतो, काही ठिकाणी कोंबडी कापतो. तसे तिथं रेडा कापला जातो म्हणतात. रेड्याचा बळी देतात. आता हे कुणाचा बळी द्यायला चालले आहेत ते माहिती नाही. पण जर दर्शनाच्या कामाला चालले असतील तर आपण एकमेकांना शुभेच्छाच देतो, असे अजित पवार म्हणाले.
![](https://shankhnaad.live/wp-content/uploads/2022/11/WhatsApp-Image-2022-11-12-at-3.06.22-PM-1024x438.jpeg)