राहुल गांधी यांच्या हस्ते संविधानाच्या एक लाख प्रती वाटण्याच्या कार्यक्रमाची सुरुवात.

0

बुलढाणा _ केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून मागील 8 वर्षात लोकशाही व संविधान धोक्यात आले असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. लोकशाही व संविधानाचे रक्षण व्हावे, यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या एस. सी. विभागाचे (Congress Committee SC Cell) अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या पुढाकाराने संविधानाच्या एक लाख प्रती वाटण्याचा संकल्प केला असून या अभियानाची सुरूवात काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या हस्ते आज करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या एस. सी. विभागाचे अध्यक्ष राजेश लिलोटीया, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी मीडिया विभागाचे अध्यक्ष जयराम रमेश, प्रभारी. एच. के. पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळ पक्षनेते तथा भारत जोडो यात्रेचे राज्य समन्वयक बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या एस. सी. विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबारे, जेष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे व पदाधिकारी उपस्थित होते.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वश्रेष्ठ संविधान भारताला दिले. या संविधानाच्या अधीन राहून लोकशाही व्यवस्थेचा कारभार देश स्वतंत्र झाल्यापासून सूरु आहे. संविधानाने सर्व जाती धर्मांच्या लोकांचे हक्क अबाधित ठेवले आहेत. विविधतेत एकता ही आपल्या देशाची ओळख कालपर्यंत अबाधित होती पण मागील 8 वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराचे सरकार केंद्रात आल्यापासून संविधान व लोकशाही मोडीत काढण्याचे काम सुरू आहे.डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले हे संविधान अबाधित रहावे व लोकशाहीचे रक्षण व्हावे यासाठी जनजागृती करण्यासठी संविधानाच्या एक लाख प्रती वाटण्याचे अभियान काँग्रेसच्या एस. सी. विभागाने हाती घेतले आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा