‘लव्ह जिहाद’ मुळे अनेक तरुणी बेपत्ता असण्याची शक्यता, विशेष पथक नेमणार-महिला व बालविकास मंत्री

0

मुंबई: राज्यात बेपत्ता झालेल्या अनेक तरुणी लव्ह जिहादमुळे बेपत्ता झाल्या असण्याची शक्यता राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Women and Child Development Minister Mangal Prabhat Lodha) यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर बेपत्ता मुली व महिलांचा शोध घेण्यासाठी एक विशेष पथक नेमणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. सध्या देशाला हादरविणारे श्रद्धा वालकर हत्याकांड प्रचंड गाजत असताना (Shraddha Walker Murder Case) या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे. यासंदर्भात आपल्याकडे मुलींच्या बेपत्ता होण्याचा कुठलाही डेटा नाही. मात्र, १० ते १२ प्रकरणे माझ्या माहितीत असून त्यात असे झाले असण्याची शक्यता आहे, असे लोढा म्हणाले.
लोढा म्हणाले, श्रद्धा वालकर हत्याकांड उघड झाल्यावर महिला आयोगाने एक विशेष पथक नेमले पाहिजे. ग्नानंतर ज्या मुलींचा आपल्या मूळ कुटुंबियांशी संपर्क तुटला आहे, त्यांची सध्या काय परिस्थिती आहे, याच आढावा घेतला पाहिजे. तसेच आपल्या कुटुंबियांच्या विरोधात जाऊन एका व्यक्तीसोबत निघून गेलेल्या मुलींची माहिती घ्यायला हवी. या मुलींना त्यांच्या कुटुंबीयांचे समर्थनही नाही. म्हणून त्यांचे काय होते, हे आपण श्रद्धा वालकर प्रकरणातून पाहिले आहे. अशा मुलींना मदत करता यावी, म्हणून मी एक विशेष पथक नेमण्याचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात आपल्याकडे बेपत्ता होण्याचा कुठलाही डेटा पुढे आलेला नाही, हे महिला व बालविकास मंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे लवकरच या पथकाकडून अशा प्रकरणांचा आढावा घेतला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा