![New-Project-2022-11-24T122331.297](https://shankhnaad.live/wp-content/uploads/2022/11/New-Project-2022-11-24T122331.297.jpg)
मुंबई: सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिल्लीला पाचारण करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. (Governor Bhagat Singh Koshyari summoned to Delhi) राज्यपालांचा आज (24 नोव्हेंबर) आणि उद्या (25 नोव्हेंबर) दिल्ली दौरा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यानंतर भगत सिंह कोश्यारी यांना दिल्लीला परत पाठविण्याची मागणीव विरोधकांकडून होत असून विरोधकांनी अलिकडेच आक्रमक भूमिका घेतली आहे. अनेक ठिकाणी राज्यपालांच्या विरोधात आंदोलने झाली आहेत. त्यामुळे राज्यपालांना दिल्लीत पाचारण करण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. दिल्ली दौऱ्यात राज्यपाल कोणाकोणाला भेटणार हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा होऊ शकते, असे संकेत आहेत.
काही दिवसांपूर्वी संभाजीनगरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 62 व्या दीक्षान्त समारंभ सोहळ्यात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे तर जुन्या युगाचे हीरो, डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. गडकरीपर्यंतचे नेते हे नवीन युगाचे हिरो असल्याचे कोश्यारी म्हणाले होते. यानंतर राज्यभर ठिकठिकाणी त्यांच्याविरोधात आंदोलने करण्यात आली. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार उदयराजे भोसले यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनी राज्यपालांचा विरोध केला. राज्यपालांकडून सातत्याने महाराष्ट्राची बदनामी होत असल्याचा आरोप केला जात जात असतानाच यात सरकार व भाजपची गोची होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे राज्यपाल कोश्यारी यांच्याशी चर्चा करून त्यांना काही सल्ला देऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.