शेतकऱ्यांच्या शेतीचा लिलाव, लावले बॅनर, अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्र्यांचे वेधले लक्ष

0

नागपूर :नागपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत नागपूर जिल्हातील शेतकऱ्यांवरील थकीत कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या शेतजमिनी लीलावामध्ये काढलेल्या आहेत. शेतकऱ्यांची यादी बॅनरद्वारे चौकात लावण्यात आली आहे. यामुळे आधीच चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांची नाहक बदनामी करण्यात येत आहे. या गंभीर बाबीकडे माजी गृहमंत्री काटोलचे आमदार अनिल देशमुख यांनी पत्राद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती ही हलाखीची असल्याने त्यांना कर्ज फेडता येणार नाही. त्यामुळे या लिलाव प्रक्रियेस स्थगिती देण्यात यावी अशी मागणी अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे केली आहे.
यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलेली मदत ही फारच कमी आहे. दुसरीकडे नागूपर जिल्हात अतिवृष्टीमुळे संत्रा व मोसंबीचे मोठया प्रमाणात नुकसान होवूनही अद्याप मदत मिळाली नाही. नापिकीतुन सोयाबीन व कापसाला बाजारात योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडुन जे कर्ज घेतले होते ते त्यांना भरता आले नाही. परंतु आता बँकेने कर्ज वसुली करण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या शेतीचे लिलाव करण्याची प्रक्रिया सुरु केल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. यामुळे कार्यवाहीस स्थगिती देण्याची विनंती अनिल देशमुख यांनी एक पत्राव्दारे देवेंद्र फडणविस यांच्याकडे केली आहे.