
-माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
नागपूर – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख काही एक संबंध नसताना केवळ राजकारणाचा भाग म्हणून, सूड भावनेतून गोवण्यात आले. आज न्यायालयात त्यांना जामीन मिळाला आहे. पण लगेच १० दिवसांची स्थगिती देण्यात आली. मात्र, या प्रकरणाचा निकाल जेव्हाही येईल, तेव्हा अनिल देशमुख हे निर्दोष मुक्त होतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज बोलून दाखविला.
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित व्हर्च्यूअल रॅलीसाठी ते आज नागपुरात (Nagpur) आले असता विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. आज देशमुख यांना जामीन मिळाल्याचे कळताच देशमुख समर्थक, राष्ट्रवादी कार्यकर्त्यानी जल्लोष साजरा केला. या पार्शवभूमीवर ते बोलत होते. पाटील म्हणाले, अनिल देशमुख यांना गेल्या वर्षी २ नोव्हेंबरला अटक झाली. एक वर्षापेक्षा जास्त काळ उलटून गेला. त्यांची सुटका होईल, याची आम्ही सर्व वाट बघत आहोत. जामीन मिळणे हा घटनेने दिलेला अधिकार आहे. पण गेल्या काही काळापासून लोकांना अशा प्रकरणात अडकवून ठेवले जात आहे. अनिल देशमुखांनी आपली बाजू न्यायालयात मांडल्यानंतर त्यांना जामीन देण्यात आला आहे.आज त्यांना जामीन झालेला असला, तरी हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. कायद्याच्या आधारे बघितले तर एका गुन्हेगाराला माफीचा साक्षीदार करणे, चुकीचे आहे. छ्त्रपती शिवरायांचा राज्यपालांकडून अपमान कारवाई अपेक्षित
दरम्यान,राज्यपालांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. याबद्दल विचारले असता, वळसे पाटील म्हणाले, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काय पत्र लिहिले आणि काय खुलासा केला, याबद्दल मला सध्या काही माहिती नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलचा आदर प्रत्येक माणसाच्या मनात आहे. त्यांच्याबद्दल कुणाकडूनही अशा प्रकारचं वक्तव्य होऊ नये. कोश्यारींच्या वक्तव्याबद्दल महाराष्ट्रातील लोकांमध्ये तीव्र संताप आहे. त्यामुळे केंद्र सरकारने योग्य ती कारवाई या प्रकरणात केली पाहिजे, अशी महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा आहे.
काही राजकीय पक्ष आणि नेते करदात्यांच्या पैशांवर डल्ला मारतात आणि शॉर्टकटचे राजकारण करतात, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नागपुरात समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनप्रसंगी केले होते. याबाबत विचारले असता, ते प्रत्यक्षपणे कुणावर बोलले, हे माहिती नाही. त्यामुळे येवढ्याच वाक्यावरून काही निष्कर्ष काढता येणार नाही, असे वळसे पाटील म्हणाले.