
मुंबई : मागील वर्षभरापासून कारागृहात असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना उच्च न्यायालायाने मोठा दिलासा दिला आहे. देशमुख यांच्या जामीनाच्या स्थगितीला मुदत वाढवून देण्याची सीबीआयची मागणी उच्च न्यायालयाची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. (Anil Deshmukh Case) त्यामुळे देशमुख यांच्या कारागृहातून सुटकेचा मार्ग मोकळा झाला असून ते उद्याच कारागृहातून बाहेर येतील, असे सांगितले जात आहे. देशमुख हे सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. १२ डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला होता. पण या निर्णयाला सीबीआयने आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. देशमुख यांच्या जामीनाला स्थगिती द्यावी अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत अनिल देशमुख यांचा जामीन कायम ठेवला आहे.
अनिल देशमुख यांना ईडीने 1 नोव्हेंबर 2021 रोजी अटक केली होती. भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी 2021 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्राना पत्र पाठवून राज्याचे तत्कालीन गृहमंत्री असलेल्या देशमुखांवर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिले होते, असा आरोप त्यांच्यावर परमबीर सिंह यांनी केला होता. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने प्राथमिक चौकशी केली होती. त्यानंतर अनिल देशमुख यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.