

चंद्रपूर(Chandrapur), सावली (Tiger Attack): चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही आणि परिसर आज एका अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक घटनेने हादरला आहे. जंगलात तेंदू पाने तोडण्यासाठी गेलेल्या चार महिलांवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची खळबळजनक घटना सकाळी उघडकीस आली.
मृतकांमध्ये कवडूबाई दादाजी मोहुर्ले (४५), अनुबाई दादाजी मोहुर्ले (४६), संगीता संतोष चौधरी (३६) आणि सुनीता कौशिक मोहुर्ले (३३) या महिलांचा समावेश आहे. वाघाने अचानक हल्ला केल्याची ही धक्कादायक घटना असून, या हिंस्त्र हल्ल्यात चारही महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नेहमीप्रमाणे या महिला जंगलात पाने तोडण्याच्या दैनंदिन कामासाठी गेल्या होत्या. सर्वजण कामात व्यस्त असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. जंगलाचा आसरा आणि हिंस्त्र प्राण्याचा वेग यामुळे महिलांना सावरण्याची संधीच मिळाली नाही आणि वाघाने चौघींनाही जागीच ठार केले.
घटनास्थळी वनविभाग व पोलीस विभागाची चमू पोहोचली असून पुढील तपास सुरू आहे.

















