Bawankule उद्धव ठाकरे आता अबू आझमी, ओवेसींशीही युती करू शकतात-बावनकुळे

0

नागपूर : शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीशी युती करण्याचे संकेत दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President Chandrashekhar Bawankule) यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. उद्धव ठाकरे आता अबू आझमी आणि असदुद्दीन ओवेसी यांची बैठक घेऊन त्यांच्यासोबतही युती करु शकतात, असा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे. राज्यातील शिंदे सरकार मजबूत असून अजूनही 20 ते 25 आमदारांचे छुपे समर्थन सरकारला आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला. त्यामुळे सरकार पाडण्याच्या भानगडीत संजय राऊत यांनी पडू नये, असेही ते म्हणाले. मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या ‘शिवशक्ती-भिमशक्ती’च्या नव्या राजकीय आघाडीची चर्चा रंगत आहेत. त्याबाबत नागपुरात बोलताना बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार दोन महिन्यात पडेल, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यावर बोलताना बावनकुळे यांनी आमचे सरकार मजबूत असून आमची आताची 164 आमदारांची संख्या पुढे 184 पर्यंत जाईल, असा दावा केला. संजय राऊत यांनी काळजी करण्याची गरज नाही. अजूनही 20-25 आमदारांचे छुपे समर्थन सरकारला आहे. त्यामुळे सरकार पाडण्याच्या भानगडीत संजय राऊत यांनी पडू नये, असेही ते म्हणाले.
राज्यपाल कोश्यारी यांनी कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलेला नाही. राज्यपाल ज्या दिवशीपासून महाराष्ट्रात आले, ते छत्रपती शिवरायांच्या शिवनेरी किल्ल्यावर गेले. शिवरायांचे देशाच्या इतिहासातील महत्त्व कोणीही कमी करु शकत नाहीत. शरद पवार आणि नितीन गडकरी यांचा गौरव करणे ठीक आहे. मात्र, छत्रपतींबद्दल राज्यपाल बोलल्याने जो वाद निर्माण झाला, त्यावर आम्ही कालच भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही सर्व छत्रपतींच्या विचारांवरच काम करत आहोत, असेही ते म्हणाले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा