नाकातून रक्तस्राव तरीही वैद्यकीय उपचारास नकार

0

जरांगे पाटलांच्या उपोषणाचा पाचवा दिवस

– महाराष्ट्र बंदला प्रतिसाद

(Jalna)जालना, १४ फेब्रुवारी  : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आग्रही असलेले मनोज जरांगे पाटील तिसऱ्यांदा उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांची तब्येत खालावत चालली आहे. उपोषणामुळे जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्तस्राव होत असल्याची माहिती समोर आली आहे. असे असले तरी ते वारंवार वैद्यकीय उपचारास नकार देत आहेत. त्यामुळे सरकारसमोरील समस्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(Manoj Jarange Patil)मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या विविध मागण्यांवर ठाम आहेत. त्यासाठी गेल्या पाच दिवसांपासून जरांगे यांनी पाणी आणि औषधोपचार घेतलेले नाहीत. त्यामुळे त्यांची तब्येत खालावली आहे. दरम्यान आज मराठा समाजाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोशल मीडियावरून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे या बंदला राज्यातील अनेक भागात प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दरम्यान समाजाने शांततेत आंदोलन करावं, असं आवाहनही जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं आहे.

माझा जीव गेल्यावर सरकार आणि महाराष्ट्र राहिल का? – मनोज जरांगे पाटील

शिंदे-फडणवीस मराठ्यांची फसवणूक करू लागले आहेत. १५ फेब्रुवारीचे अधिवेशन २० फेब्रुवारीपर्यंत पुढे का ढकलले? उद्याच्या उद्या सगे-सोयरे असा शब्द असलेला आरक्षणाचा कायदा करावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. दरम्यान माझा जीव गेल्यावर सरकार राहिल का? महाराष्ट्र राहिलं का असे म्हणत महाराष्ट्राची श्रीलंका होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

कोणत्या मागण्यांसाठी सुरू आहे उपोषण?

– सगे-सोयरे शब्दाच्या अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करून त्याची अंमलबजावणी करा, हा कायदा बवनण्यासाठी येणाऱ्या दोन दिवसात विशेष अधिवेशन घ्या, ५७ लाख नोंदी सापडल्या त्यांना तातडीने प्रमाणपत्र द्या, त्यांच्या नातेवाईकांना शपथ पत्राच्या आधारे प्रमाणपत्र द्या, ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या याद्या ग्रामपंचायतवर लावा, बंद पडलेली शिबिरं पुन्हा सुरू करण्यात यावीत, अंतरवालीसह राज्यभरातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, हैद्राबाद, बॉम्बे गॅझेटमधील नोंदी ग्राह्य धरा, शिंदे समितीचे काम युद्ध पातळीवर सुरू ठेवून एक वर्षाची मुदतवाढ द्या, मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून कायदा करा त्याची अंमलबजावणी करा

जरांगेच्या आवाहननंतर जालना, मनमाड बंद

सकल मराठा समाजाच्या वतीनं महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलंय. त्यानंतर या आवाहनाला जालना जिल्ह्यासह नाशिकच्या मनमाडमध्ये प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मनोज जरांगे पाटलांच्या मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी, यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. जालना शहातील मुख्य बाजार पेठेतील सर्व दुकानं बंद ठेवून प्रतिसाद देण्यात आला आहे. तसेच मनमाडमध्येही व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपले व्यवसाय बंद ठेवल्याने सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला. मराठा आरक्षण अध्यदेशाचे शासनाने कायद्यात रूपांतर करावे, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. मनमाडसह नांदगावमध्येही कडकडीत बंद पाळण्यात आला.