
राजुरा (ता.प्र) :— राज्यात नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच, मतमोजणी पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे (EVM) मशीनच्या सुरक्षिततेविषयी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान पार पडले असले तरी, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३ डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी २१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्यामुळे या दीर्घकाळात स्ट्राँग रूम सुरक्षिततेचा मुद्दा अधिक गंभीर बनला आहे.
देशभरात मत चोरी आणि EVM हॅकिंगचे दावे गाजत असताना सर्वसामान्य मतदारांमध्ये EVM विषयी अविश्वासाचे वातावरण दिसून येत आहे. इलेक्ट्रॉनिक यंत्र असल्याने सॅटेलाइट किंवा मोबाईल इंटरनेटच्या माध्यमातून EVM हॅकिंगची भीती जनतेत व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील स्ट्राँग रूम परिसर पूर्णपणे सुरक्षित राहावा, कोणताही बाह्य नेटवर्क सिग्नल किंवा इलेक्ट्रॉनिक हस्तक्षेप होऊ नये यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांना निवेदन सादर करून स्ट्राँग रूम परिसरात जॅमर बसवण्याची तातडीची मागणी केली आहे. धोटे यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले की, नागरिकांचा EVM व मतदान प्रक्रियेवरील विश्वास अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने अत्याधुनिक सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे असून त्यात जॅमर स्थापनेला प्राधान्य द्यावे.



















