शिवसेना आमदार अनिल बाबर यांचं निधन

0

 

* राज्य मंत्रिमंडळाची बैठक ऐनवेळी रद्द

मुंबई / सांगली, Mumbai / Sangli  ३१ जानेवारी : खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू अनिल बाबर Anil Babar यांचे आकस्मिक निधन झाले आहे. ते ७४ वर्षांचे होते. न्यूमोनिया झाल्याने यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबर यांची ‘पाणीदार आमदार’ म्हणून ओळख होती.

बाबर यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी नियोजित कार्यक्रम रद्द करत तातडीने सांगलीला रवाना झाले. त्या पार्श्वभूमीवर आजची राज्य मंत्रिमंडळाची बैठक ऐनवेळी रद्द करण्यात आली.

खानापूर तालुक्यातील गार्डी या छोट्याशा गावात ७ जानेवारी १९५० रोजी बाबर यांचा जन्म झाला. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी गार्डी गावच्या सरपंच पदापासून आपला राजकीय संघर्षमय प्रवास सुरू केला. सरपंच ते विधानसभा सदस्य असा त्यांचा मोठा राजकीय संघर्षमय प्रवास संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवला. खानापूर पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्यापासून विधानसभा सभागृहात त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी आवाज उठवला. प्रसंगी मंत्रीपदापासून दूर राहत केवळ शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी लढणारे सर्वसामान्यांचे नेते म्हणून बाबर यांच्याकडे पाहिले जात होते.

राष्ट्रवादी पुरस्कृत सदाशिव पाटील यांचा अनिल बाबर यांनी २०१९ मध्ये पराभव केला होता. अनिल बाबर यांचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना असा राजकीय प्रवास आहे. अनिल बाबर हे १९९०, १९९९, २०१४, २०१९ अशा चार वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.

शिवसेनेत फूट पडल्यापासून बाबर यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. महाविकास आघाडीवर आपली नाराजी व्यक्त करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला सुरुवातीपासून खंबीर साथ दिली होती. गुवाहाटीमध्येही ते शिंदे यांच्या सोबत होते. ठाकरे गटाकडून अपात्रतेप्रकरणी जी नावं दिली, त्या यादीत अनिल बाबर यांचं नाव आघाडीवर होतं.

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बाबर यांनी वयाच्या १९ व्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवलं होतं. खानापूर तालुक्यातील गर्दी गावाचे सरपंच म्हणून ते निवडून आले होते. टेंभू योजना पूर्णत्वाकडे नेण्यात त्याचा मोलाचा वाटा मानला जातो.

शिवसेनेचा समाजकार्याचा वारसा चालवणारा सच्चा लोकप्रतिनिधी गमावला – मुख्यमंत्री

* शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना

मुंबई, ३१ जानेवारी  : आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने आपण खऱ्या अर्थाने शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

अनिल बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत.

मुख्यमंत्री म्हणतात की, आपल्या खानापूर आटपाडी मतदारसंघांमध्ये त्यांनी शिवसेनेचे केलेले कार्य कधीही न विसरण्याजोगे आहे. सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी आणण्यासाठी सिंचनासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. कृष्णा खोऱ्यातील पाणी आणि टेंभू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून ते सतत झगडत होते.

बेघरांना घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे किंवा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा तळागाळापर्यंत केलेला प्रसार असो, अनिल बाबर यांनी एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम केले. खानापूर आटपाडी भागामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी अनिल बाबर हे कायम एका लढाऊ वृत्तीने लढले. त्यांनी या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केले.

त्यांच्या निधनाने शिवसेनेचा एक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी, माझा जवळचा सहकारी आणि मार्गदर्शक आम्ही गमावला आहे असेही मुख्यमंत्री आपल्या शोक संदेशात म्हणाले.