चंद्रपूर: मुंबईला जाणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी उपयुक्त असलेली सेवाग्राम एक्स्प्रेस बंद करण्यात आली. ही गाडी सर्वांसाठी जणू संजीवनी होती. ती बंद असल्याने सामान्य प्रवाश्यांचे हाल होत आहे. त्यामुळे आमची सेवाग्राम एक्स्प्रेस परत करा, या मागणीसह चंद्रपूर रेल्वे सुविधा संघर्ष समितीतर्फ आंदोलन करण्यात आले. चंद्रपूरकरांनी काळे झेंडे दाखवत रेल्वे प्रशासनाविरोधात रेल्वे स्टेशनवर नारेबाजी करत आंदोलन केले. चंद्रपूर हे राज्यातील महत्त्वपूर्ण औद्योगिक महानगर असताना येथील नागरिकांना रेल्वेच्या सुविधा मिळत नाहीत. यासाठी अनेक वेळा निवेदन दिले, मंत्री अधिकारी सर्वांच्या भेटी घेतल्या. परंतु, 2019 नंतर रेल्वे विभागाचे दुर्लक्ष झाले. रेल्वे यात्री सुविधा समिती चंद्रपुरात आली, त्यांनी ही मागण्यांची दखल घेतली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचा इशारा चंद्रपूर रेल्वे सुविधा संघर्ष समितीने विभागीय रेल्वे प्रशासनाला दिला आहे.
संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष दामोदर मंत्री यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. जिल्हा सत्र न्यायालयासमोर समितिच्या सदस्यांचे एकत्रीकरण झाल्यावर हा मोर्चा बसस्थानकाकडे वळला. पुणे गाडी 3 बार, मुंबई गाडी हर वार अशा घोषणा देत, आंदोलनकर्त्यांनी रेल्वे स्टेशन परिसरात निदर्शने केली सचिव नरेंद्र सोनी, रमणिकभाई चव्हाण, प्रदीप माहेश्वरी, पूनम तिवारी, रमेश बोथरा, डॉ भुपेश भलमे, डॉ. मिलिंद दाभोरे, नरेश लेखवाणी, संजय मंगाणी, अशोक रोहरा, श्याम सारडा, गौतम यादव व शंकरसिंह राजपुरोहित यांच्यासह शेकडो चंद्रपूरकरांनी आंदोलनात सहभाग दर्शविला.
नागपुरात 17 मार्चला आंदलोन
आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात चंद्रपूर रेल सुविधा संघर्ष समिती 16 मार्च पर्यंत चंद्रपूर येथे रेल्वे अधिकाऱ्यांना काळे झेंडे दाखविणार आहेत. यानंतर 17 मार्चला नागपूर येथील डीआरएम कार्यालयासमोर काळे झेंडे अधिकाऱ्यांना दाखविले जाणार असल्याची माहिती संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष दामोदर मंत्री यांनी दिली. किमान 150 कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. यात बंगाली बांधवांचा सहभाग होता. बंगाली बांधवांनी यावेळी हावडा-(कोलकता) मेलसंदर्भात मागणी केली.