अमरावतीत महायुतीला धक्का, भाजपाला टेन्शन

0

 

अमरावतीत महायुतीला धक्का, भाजपाला टेन्शन; नवनीत राणांविरोधात ‘प्रहार’चा उमेदवार

अमरावती (Amravti), 29 मार्च  लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यानंतर आता बच्चू कडू यांची प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. प्रहारने या लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटातून आलेल्या दिनेश बूब यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

प्रहारचे आमदार राजकुमार पटेल म्हणाले की, प्रहारच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. अमरावतीत संघटनेने उमेदवार उतरावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. माझ्यावर बच्चू कडूंनी जबाबदारी दिली. अमरावतीत मैत्रीपूर्ण लढत लढण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. दिनेश बूब यांनी निवडणुकीत उभं राहण्याचा निर्णय घेतला. अमरावती लोकसभा मतदारसंघातून प्रहारचे उमेदवार असतील अशी घोषणा मी करतो असं त्यांनी सांगितले.

तसेच दिनेश बूब हे इच्छुक उमेदवार होते. शिवसेना ठाकरे गटाने ही जागा काँग्रेसला दिली. दिनेश बूब यांना प्रहारचे उमेदवार म्हणून मैदानात उतरवत आहोत. बूब यांच्याबाबत मतदारसंघात सकारात्मक वातावरण आहे. अमरावती मतदारसंघात २ आमदार आहेत. आम्हाला लोकसभेची एक जागा हवी होती. महायुतीत आम्ही एक जागा मागितली तर चुकीचे काय? पक्ष वाढावा असं सगळ्यांनाच वाटते असं आमदार राजकुमार पटेल यांनी म्हटलं.

दरम्यान, माझ्यासमोर २ उमेदवार आहेत ते विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत. सरकारी पैशातून श्रेयवादाचे बॅनर्स लावणे हे मला कुणी शिकवलं नाही. मी शेकडो कोटी रुपयाचे काम केले पण कुठेही माझ्या नावाचा बोर्ड लावला नाही. विकासकामे होत राहतील पण समाजासमाजामध्ये दरी निर्माण होत आहे. ही दरी दूर करण्यासाठी चांगल्या लोकप्रतिनिधीची गरज आहे असं दिनेश बूब यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंनी राजीनामा मागितला तर…

प्रहार ही संघटना शिवसेनेतूनच निर्माण झालीय, त्यामुळे आमच्यासाठी वेगळा पक्ष नाही. त्यामुळे राजीनामा देण्याचा सोपस्कार करण्याची आवश्यकता वाटत नाही. शिवसेना रक्तातून काढू शकत नाही. हा भावनिक विषय, भगवा झेंडा हाती घेऊनच निवडणुकीला सामोरे जाणार आहे. जर उद्धव ठाकरेंनी राजीनामा मागितला तर देऊ. प्रहारकडून ही निवडणूक लढवावी अशी सर्वांची इच्छा आहे.