सोलापूर- आषाढीनिमित्त सोलापूर जिल्ह्यात आलेले गुलाबी वादळ आता माजी मंत्री तथा भाजपचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात घोंगावत आहे. या तालुक्यातील अनेक गावचे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य असे ३५० जण भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश करण्यासाठी हैदराबादकडे रवाना झाले आहेत. तब्बल ४० गाड्यांमधून हे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य शक्तीप्रदर्शन करीत मार्गस्थ झाले आहेत.
पंढरपूरचे भगीरथ भालके यांच्यानंतर भाजपचे माजी खासदार लिंगराज वल्याळ यांचे पुत्र नागेश वल्याळ यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला आहे. वल्याळ यांनी बीआरएस वाढीसाठी प्रयत्न चालवले आहेत, त्यातूनच सचिन सोनटक्के आणि नागेश वल्याळ यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील बहुतांश सरपंच हे बीआरएस प्रवेशासाठी हैदराबादला रवाना झाले आहेत.
दक्षिण सोलापूर तालुक्यावर आजपर्यंत धनगर समाजाचे प्राबल्य राहिले आहे. त्या दृष्टीकोनातून येत्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण सोलापुरातून आपली उमेदवारी निश्चितीसाठी सचिन सोनटक्के हे तालुक्यातील बहुतांश सरपंचांना घेऊन हैदराबादकडे रवाना झाले.