नवी दिल्ली : केंद्रात भाजपचे सरकार असून देशाची एक इंचही जमीन कोणी घेऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah on Tawang Incident) यांनी व्यक्त केली आहे. अरुणाचल प्रदेशात तवांग येथे भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीवर भाष्य करताना अमित शहा यांनी ही प्रतिक्रिया दिली. या मुद्यावर टीका करणाऱ्या काँग्रेसलाही त्यांनी सुनावले. राजीव गांधी फाऊंडेशनला 2005-06 आणि 2006-07 या वर्षात चिनी दूतावासाकडून 1 कोटी 35 लाखांचे अनुदान मिळाले होते तर इस्लामिक रिसर्च फाऊंडेशचा प्रमुख झाकीर नाईकने 7 जुलै 2011 रोजी राजीव गांधी फाऊंडेशला 50 लाख रुपयांचा निधी दिला होता, असे नमूद करताना अमित शहा यांनी काँग्रेसला आरसा दाखविला.
गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, हे भाजपचे सरकार आहे. नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत. जोपर्यंत हे सरकार आहे, तोपर्यंत एक इंचही जमीन कोणी घेऊ शकत नाही. भारतीय सैन्याने तवांगमध्ये दाखवलेल्या पराक्रमाचे आपण कौतुक करतो. त्यांनी काही वेळातच घुसखोरी करणाऱ्या चिनी सैन्याला माघारी पाठवले. 2011 मध्ये काँग्रेस सरकारने चीनच्या धमकीनंतर सीमेवरील बांधकाम थांबवले होते. काँग्रेस सरकारच्याच कार्यकाळात हजारो एकर जमिनी बळकावल्या होत्या, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. राजीव गांधी फाऊंडेशनला 2005-06 आणि 2006-07 या वर्षात चिनी दुतावासाकडून 1 कोटी 35 लाखांचे अनुदान मिळाले होते. हे एफसीआरचे कायदे त्याच्या मर्यादांच्या अनुरुप नसल्याने नोटीस पाठवून कायदेशीर प्रक्रियेचे पालन करुन या फाऊंडेशनचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यात आले होते. तसेच राजीव गांधी फाऊंडेशनचे एफसीआरए रजिस्ट्रेशन रद्द करण्याचे आणखी एक कारण म्हणजे, इस्लामिक रिसर्च फाऊंडेशचा प्रमुख झाकीर नाईकने 7 जुलै 2011 रोजी फाऊंडेशला 50 लाख रुपयांचा निधी दिला होता. या फाऊंडेशनचे कर्ताधर्ता गांधी कुटुंब आहे. झाकीर नाईकने हा पैसा कोणत्या उद्देशाने दिला होता? हे त्यांनी सांगावे, अशी मागणी अमित शहा यांनी केली.