
मृतदेह संध्याकाळी पुण्यात आणणार
Pahalgam terror attack: भारताचं नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाम पर्यटकांच्या रक्ताच्या सड्याने लाल झाला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात आतापर्यंत 28 जण मृत्युमुखी पडले आहेत.
Kashmir Pahalgam terror attack: पहलगाममध्ये कोल्हापुरातील तीन कुटुंब अडकली
पहलगामच्या बैसरनमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्याठिकाणी हल्ल्याच्या काही तास आधी कोल्हापुरातील तीन कुटुंब होती.. सुदैवाने ही कुटुंब दहशतवादी हल्ल्यातून वाचले आहेत… पहलगामला गेलेले पर्यटक काल रात्री कोल्हापुरात दाखल झाले आहेत… ही घटना समजल्यानंतर आज सकाळपर्यंत पाहुण्यांचे फोन येत होते…घरातील सदस्य घाबरून गेले आहेत…केवळ दैव बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो असून आता भारत सरकारने कठोर निर्णय घेऊन दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी या पर्यटकांनी केली आहे
*जम्मू कश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेले सोलापूर जिल्ह्यातील 47 नागरिक श्रीनगर येथील हॉटेलमध्ये सुरक्षित.
*टुरिस्ट कंपन्यांशी जिल्हा प्रशासनाचा संपर्क, जम्मू कश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांची माहिती घेतली जात आहे.
जम्मू कश्मीर येथील पहलगाम येथील पर्यटकावर दहशतवाद्यांनी दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी हल्ला केला. यामध्ये मृत्यू झालेल्या किंवा जखमी असलेल्या नागरिकांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील नागरिक नाहीत. सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यातील 47 नागरिक श्रीनगर येथील एका हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत. जिल्ह्यातील आणखी काही नागरिक जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले आहेत किंवा नाही याविषयीची माहिती टुरिस्ट कंपन्यांशी संपर्क करून प्रशासन घेत आहे. तरी जम्मू कश्मीर मध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाची त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.
जम्मू कश्मीर मध्ये सोलापूर जिल्ह्यातील पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व तहसीलदार व प्रांताधिकारी यांची सकाळी बैठक घेऊन गाव निहाय पर्यटकांच्या याद्या करण्याबाबतचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच तालुकास्तरावरील टुरिस्ट ऑपरेटर त्यांच्या संपर्कात राहून पर्यटकांची नावे घेण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. त्याचप्रमाणे प्रशासन जिल्हास्तरावरील सर्व टुरिस्ट कंपन्यांच्या संपर्कात असून त्यांच्याकडून जिल्ह्यातील पर्यटकांचे नावे घेण्यात येत आहेत.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत संपर्क क्रमांक देण्यात आलेले असून जम्मू कश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांच्या नातेवाईकांनी दिलेल्या संपर्क क्रमांकावर प्रशासनाला माहिती द्यावी. प्रशासनाच्या वतीने सर्व पर्यटकांना सहकार्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली. तसेच सद्यस्थितीत मिळालेल्या माहितीप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील 47 पर्यटक श्रीनगर येथे सुरक्षित असल्याची माहिती मिळाली असून ते पर्यटक एकत्रित एका हॉटेलवर थांबलेले आहेत. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या किंवा जखमी असलेल्या पर्यटकांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील नागरिक नाहीत त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून तसेच ज्यांचे नातेवाईक जम्मू-काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेले आहेत अशा नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा प्रशासनाला संपर्क करावा व त्यांची माहिती उपलब्ध करून द्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
पिंपळनेर तालुका माढा येथील सरपंच राहुल पेटकर हे 47 नागरिकांसोबत श्रीनगर येथे एका हॉटेलमध्ये थांबलेले असून श्री. पेटकर यांच्याशी तसेच पोलीस पाटील यांच्याशी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून त्यांच्या व सोबतच्या सर्व नागरिकांच्या सुरक्षेची माहिती घेतली तसेच त्यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवश्यक असलेले सर्व सहकार्य उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासनही देण्यात आलेले आहे.
श्रीनगरहून चार तर दिल्ली आणि मुंबई येथून प्रत्येकी दोन विशेष विमानांची व्यवस्था
काश्मीरमधील भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी प्रभावित पर्यटक आणि पीडितांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी त्वरेने कार्यवाही सुरू केली आहे.
नायडू यांनी वैयक्तिकरित्या गृहमंत्र्यांशी संवाद साधला. ते चोवीस तास परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी सतत समन्वय साधत आहेत. तात्काळ मदतीच्या उपायांचा एक भाग म्हणून, श्रीनगरहून चार विशेष विमानांच्या उड्डाणांची त्याचबरोबर दिल्ली आणि मुंबई येथून प्रत्येकी दोन विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे. यानंतरही जर गरज पडली तर, अतिरिक्त उड्डाणांची तयारी ठेवण्यात आली आहे.
मंत्री राम मोहन नायडू यांनी सर्व एअरलाइन ऑपरेटर्सची तातडीची बैठक घेतली आहे. या संवेदनशील काळात कोणत्याही प्रवाशावर भार पडणार नाही याची खात्री करून नियमित भाडे पातळी राखण्याचे निर्देश विमान सेवा देणा-या कंपन्यांना देण्यात आले आहेत.
या व्यतिरिक्त, राम मोहन नायडू यांनी सर्व विमान कंपन्यांना तेथील हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांचे पार्थिव आणण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्राधिकरणांशी समन्वय साधून पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.नागरी उड्डाण मंत्रालय अत्यंत सतर्क आहे आणि हल्ल्यातील पीडितांना शक्य ती सर्व मदत करण्यासाठी वचनबद्ध आहे.