नागपूर -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या विदर्भ दौऱ्यात 75 हजार कोटींच्या विकासकामांची भेट दिली. पंतप्रधान येणार म्हणून नागपूरकरांमध्येही उत्साह होता. मात्र पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे पंतप्रधान नागपुरातील कार्यक्रम संपवून गोव्यातही पोहोचले. तरी नागपूरकरांची वाहतुकीची गाडी रुळावर आलेली नव्हती. अनेकांना तरी आधी सभास्थळी जाता आले नाही आणि नंतर सभास्थळावरुन मुख्यमार्गापर्यंत वाहने निघण्यासाठी तास दीड तास लागला. पत्रकारांनाही याचा फटका बसला.
आगामी नागपूर महानगरपालिका निवडणूका लक्षात घेता. पंतप्रधानांच्या या दौऱ्याद्वारे शक्ती प्रदर्शन करण्यासाठी भाजपनेही कंबर कसली होती. पंतप्रधान जाणाऱ्या मार्गांवर मोठे बॅनर्स, भारतीय जनता पक्षाचे झेंडे, भाजपच्या ध्वजाच्या रंगाचे फुगे आदी शहरातील रस्त्यांची सजावट करण्यात आली होती. कधीही न झालेले रस्ते दुरुस्तीचे काम रात्रांदिवस संबधित यंत्रणांनी केले. पंतप्रधानांच्या ताफ्यास अडचण होऊ नये म्हणून शहरातील अनेक मार्ग नागपूर पोलिसांनी बंद केले होते. सामान्य नागपूरकरांच्या सोयीसाठी मात्र प्रशासनाने कुठलेही नियोजन गांभीर्याने केले नसल्याचे एम्स, मिहान आणि वर्धा रोडवरील वाहतूक कोंडीतून दुपारी उशिरापर्यंत दिसून आले. लोखंडी पूल, रेल्वे स्थानक असो की इतरही ठिकाणी या दौऱ्यानंतर वाहतूक कोंडीचा सामना नागपूरकराना बसला. यानिमित्ताने नागपूर मात्र चकाचक झाले. व्हीआयपी व्यक्तींच्याच आगमनाच्या वेळी हे चित्र बदलते वर्षभर ते कायम का रहात नाही असा सवाल यानिमित्ताने नागरिकांनी बोलून दाखविला.